रिसोड | वाशिम जिल्हा|२४ फेब्रुवारी २०२६
ऑपरेशन मुस्कान अंतर्गत रिसोड पोलिसांनी केलेल्या विशेष शोध मोहिमेत अपहरण प्रकरणांचा छडा लावत बेपत्ता नागरिकांना सुरक्षित परत आणण्यात मोठे यश मिळाले आहे. मागील १५ दिवसांत ४ अपहरण गुन्हे उघडकीस आणत ६ बेपत्ता पुरुष व महिलांचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले. या प्रभावी कारवाईमुळे वाशिम जिल्ह्यात नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना अधिक मजबूत झाली आहे.
दि. २५ डिसेंबर २०२५ रोजी लोणी खुर्द येथील भागुबाई पारवे यांनी १७ वर्षीय मुलगी हरवल्याची तक्रार दिली होती. तपासादरम्यान ती हरदा (जि. खंडवा, मध्यप्रदेश) येथे आढळून आली.
दि. १३ फेब्रुवारी २०२६ रोजी शिवाजीनगर येथील जानुसिंग राठोड यांनी १६ वर्षीय मुलाच्या अपहरणाची तक्रार दिली. तपासादरम्यान सदर मुलगा सुलतानपूर (जि. बुलढाणा) येथे सापडला.
दि. १६ फेब्रुवारी २०२६ रोजी वडजी येथील नसरीनबी पठाण यांनी १६ वर्षीय मुलगी हरवल्याची तक्रार दिली होती. पोलिसांनी शोध घेऊन मुलगी नागरतास, मालेगाव (जि. वाशिम) येथून ताब्यात घेतली.
रामेश्वर चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील ‘ऑपरेशन मुस्कान’ पथकातील शिवचरण डोंगरे, संजय नंदकुले, वसंत तहकीक, आशिष पाठक, महादेव चव्हाण, मंगेश मालवे, संतोष अवगळे, सुरेश येरमुले, अनिल राठोड, रुपेश मस्के, गणेश हाके, विनोद मस्के, कसुम पठाण, अमोल हाके, माणिक जुगाडे आणि सुनिल तिवाले यांनी ही कामगिरी पार पाडली.
कमी कालावधीत गुन्ह्यांचा छडा लावत प्रभावी तपास केल्याबद्दल पोलिसांचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून या कारवाईमुळे नागरिकांमध्ये विश्वास व सुरक्षिततेची भावना अधिक दृढ झाली आहे.














