साखरखेर्डा येथील सरकारी ई-क्लास जमिनीवर कथित अतिक्रमणाचा प्रयत्न झाल्याने परिसरात संतापाची लाट उसळली आहे. अनेक वर्षांपासून विद्यार्थी, युवक आणि नागरिकांसाठी उपयोगात असलेल्या क्रीडांगणाची जमीन रात्रीच्या वेळी नांगरून ताब्यात घेण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या घटनेनंतर शेकडो युवकांनी घटनास्थळी धाव घेत संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली असून ही जमीन कायमस्वरूपी क्रीडांगणासाठी राखीव ठेवण्याचा ठाम आग्रह धरला आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, जमीन मोजणीत कथित फेरफार करून संबंधित जमीन खासगी मालकीची असल्याचा भास निर्माण करण्यात आला. त्यानंतर रात्रीच्या वेळी क्रीडांगणावर नांगर फिरवून सरकारी जमिनीवर ताबा मिळविण्याचा प्रयत्न करण्यात आला. सकाळी हा प्रकार समोर आल्यानंतर गावातील युवक, नागरिक आणि विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले.
संतप्त नागरिकांनी तहसीलदार अजित दिवटे आणि साखरखेर्डा पोलीस ठाण्याचे ठाणेदार युवराज रबडे यांना निवेदन देत सरकारी जमिनीवर अतिक्रमणाचा प्रयत्न करणाऱ्यांविरुद्ध तातडीने गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
गट क्रमांक ८७० मधील सुमारे ९ हेक्टर ६२ आर क्षेत्रापैकी १ हेक्टर ६२ आर जमीन अनेक वर्षांपूर्वी साखरखेर्डा एज्युकेशन सोसायटीला भाडेतत्त्वावर देण्यात आली होती. गेल्या जवळपास पन्नास वर्षांपासून या ठिकाणी भव्य क्रीडांगण तयार करण्यात आले असून शाळेतील विद्यार्थी, गावातील युवक तसेच ज्येष्ठ नागरिक नियमितपणे या मैदानाचा वापर करत होते.
दरम्यान, संबंधित संस्था जमीन वापरत नसल्याचे आणि भाडेही भरले जात नसल्याच्या कारणावरून महसूल विभागाने ३० जानेवारी २०२५ रोजी ही जमीन पुन्हा शासन ताब्यात घेतल्याचे सांगितले जाते. त्यानंतर या परिसरातील काही जमिनींच्या वर्गवारीत फेरफार झाल्याचे आरोप होत असून, भूखंड तयार करून विक्रीचे प्रकार सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
सरकारी ई-क्लास जमीन ही भूमिहीन आणि सार्वजनिक हितासाठी असताना काही भू-माफिया लाखोंच्या व्यवहारातून अशा जमिनींवर ताबा मिळवत असल्याचा गंभीर आरोप संतप्त युवकांनी केला. या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
युवा सेना तालुका प्रमुख संदीप मगर, शिंदे सेनेचे गोपाल राजपूत, संतोष राजपूत, श्याम खरात, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा सरचिटणीस विशाल गवई यांच्यासह शेकडो युवकांनी प्रशासनाला निवेदन देत कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
युवा सेना तालुका प्रमुख संदीप मगर यांनी हे प्रकरण विधानमंडळात मांडण्यासाठी शिवसेनेच्या आमदारांकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे आणि केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनाही याबाबत माहिती देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, साखरखेर्डा ग्रामपंचायतीने संबंधित जमीन कायमस्वरूपी सार्वजनिक क्रीडांगण म्हणून राखीव ठेवण्याचा ठराव तहसीलदारांकडे सादर केला असल्याची माहिती सरपंच सौ. ज्योती अमित जाधव यांनी दिली. गावातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी महसूल विभागाने तातडीने निर्णय घ्यावा, असे मत ठाणेदार युवराज रबडे यांनी व्यक्त केले आहे.
सरकारी ताब्यातील या ई-क्लास जमिनीबाबत प्रशासन पुढे कोणती भूमिका घेते, अतिक्रमणाचा प्रयत्न करणाऱ्यांवर कारवाई होते का आणि क्रीडांगण कायम राखले जाते का, याकडे आता संपूर्ण साखरखेर्डा परिसरासह जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
📢 KattaNews.in वर सर्वात आधी वाचा
बुलढाणा जिल्ह्यासह महाराष्ट्रातील ताज्या, विश्वासार्ह आणि वेगवान बातम्या वाचण्यासाठी KattaNews.in ला नियमित भेट द्या. ही बातमी आपल्या मित्र-परिवारासोबत नक्की शेअर करा.
🔴 संबंधित बातम्या
- साखरखेर्ड्यात दामिनी पथक ॲक्शन मोडमध्ये; टवाळखोरांना थेट इशारा, विद्यार्थिनींना दिला मोठा दिलासा
- स्मशानभूमीच्या प्रश्नावर सभागृहात आमदार सिद्धार्थ खरात आक्रमक; मंत्री जयकुमार गोरे यांची मोठी घोषणा, स्वतंत्र धोरणाची ग्वाही
- चिखली नगर परिषदेचा अजब कारभार; मालमत्ता करात चक्क 10 पट वाढ? मनसेने सादर केले पुरावे, आंदोलनाचा इशारा











