साखरखेर्डा,प्रतिनिधी |समाधान सरकटे
या प्रकरणी साखरखेर्डा येथील युवकांनी जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्या माध्यमातून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे निवेदन सादर करून संपूर्ण व्यवहाराची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात मोठी चर्चा सुरू झाली असून महसूल प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
माहितीनुसार, गट क्रमांक 870 मधील ई-क्लास जमीन शासनाने भूमिहीन शेतमजुरांच्या उदरनिर्वाहासाठी वितरित केली होती. संबंधित लाभार्थ्यांना शेती करण्यासाठी जमीन देण्यात आली होती. तसेच याच गटातील काही क्षेत्र साखरखेर्डा एज्युकेशन सोसायटीला क्रीडांगणासाठी भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्यात आले होते.
मात्र, कालांतराने वर्ग-दोनमधील जमीन कथितपणे वर्ग-एकमध्ये रूपांतरित करण्यात आली आणि त्यानंतर ती जमीन खासगी व्यक्तींच्या नावावर गेल्याचा आरोप करण्यात आला आहे. स्थानिक नागरिकांच्या मते, या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात फेरफार करण्यात आला असून जवळपास आठ हेक्टर क्षेत्रावर संशयास्पद व्यवहार झाल्याचे सांगितले जात आहे.
यातील काही जमिनीवर प्लॉट पाडून विक्रीची तयारी सुरू असल्याचाही आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे शासनाच्या मालमत्तेचे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून या संपूर्ण व्यवहाराची न्यायालयीन किंवा विशेष तपास यंत्रणेमार्फत चौकशी करण्याची मागणी पुढे येत आहे.
दरम्यान, साखरखेर्डा एज्युकेशन सोसायटीच्या क्रीडांगणाबाबतही नवीन वाद निर्माण झाला आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, शासन नोंदीत असलेल्या जागेवर काही व्यक्तींनी नांगर टाकून ताबा घेण्याचा प्रयत्न केला. ही माहिती मिळताच शेकडो युवक घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थिती तणावपूर्ण बनली.
युवकांनी तत्काळ उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि पोलिस प्रशासनाशी संपर्क साधत घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर प्रशासनाने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन संबंधित जागेचे सपाटीकरण करण्याचे आदेश दिले. दुसऱ्याच दिवशी महसूल विभागाने आवश्यक कार्यवाही केल्याचे सांगण्यात आले.
या संपूर्ण प्रकरणामुळे महसूल विभागाच्या नोंदी, फेरफार प्रक्रिया आणि जमीन वर्गीकरणाबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून, संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी आता अधिक जोर धरत आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी गट क्रमांक 870, 843 आणि परिसरातील इतर गटांची मोजणी करून सीमा खुना निश्चित करण्याचे काम भूमी अभिलेख कार्यालय, सिंदखेडराजा यांच्या पथकाकडून सुरू करण्यात आले होते. मात्र, स्थानिकांच्या म्हणण्यानुसार प्रत्यक्ष मोजणीचे काम पूर्ण न करता कार्यालयीन स्तरावरच काही नोंदी करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
युवा सेना तालुका प्रमुख संदीप मगर आणि बहुजन आघाडीचे जिल्हा सरचिटणीस विशाल गवई यांनी आरोप केला की, काही गट क्रमांकांच्या मोजणी अहवालात प्रत्यक्ष पाहणी न करता फेरफार करण्यात आल्याचा संशय आहे. या संदर्भातील सर्व कागदपत्रांची स्वतंत्र चौकशी करून सत्य बाहेर आणावे, अशी त्यांची मागणी आहे.
भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकारी मारोती थोरवे यांच्या कार्यपद्धतीबाबत यापूर्वीही अनेक तक्रारी झाल्याचे स्थानिकांनी सांगितले आहे. त्यांच्या विरोधात खातेनिहाय चौकशी करून दोषी आढळल्यास कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. संबंधित अधिकाऱ्यांची बदली झाल्याची माहिती असली तरी ते अद्याप त्याच ठिकाणी कार्यरत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
या प्रकरणातील आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मोजणी अहवालावर सह्या झाल्याचे दाखविण्यात आलेल्या काही संबंधितांनी त्या अहवालाशी आपला कोणताही संबंध नसल्याचा दावा केला आहे. त्यामुळे मोजणी प्रक्रिया, फेरफार नोंदी आणि जमीन वर्गीकरणात मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाली असावी, अशी शंका व्यक्त केली जात आहे.
गट क्रमांक 870 मधील ई-क्लास जमीन प्रकरणामुळे संपूर्ण साखरखेर्डा परिसरात खळबळ उडाली असून, शासनाच्या जमिनींच्या संरक्षणाबाबत प्रशासनाने कठोर भूमिका घ्यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. या प्रकरणातील सर्व महसूल नोंदी, फेरफार, मोजणी अहवाल आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या भूमिकेची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी युवकांनी केली आहे.
यासंदर्भात युवा सेना तालुका प्रमुख संदीप मगर, बहुजन आघाडीचे जिल्हा सरचिटणीस विशाल गवई, श्याम खरात यांच्यासह शेकडो युवकांनी जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्या माध्यमातून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदन सादर करून महाराष्ट्र जमीन महसूल संहितेच्या कलम 155 अंतर्गत दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी केली क्रीडांगणाची पाहणी
शनिवारी (12 जुलै) माजी महसूल राज्यमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी संबंधित क्रीडांगणाची प्रत्यक्ष पाहणी केली. स्थानिक नागरिक व युवकांशी चर्चा करून त्यांनी संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रामभाऊ जाधव, शिवसेना (उबाठा) नेते रविंद्र पाटील, माजी उपसरपंच सय्यद रफीक, शुभम राजपूत, श्याम खरात, बाबा तिवारी यांच्यासह शेकडो युवक उपस्थित होते.
📢 KattaNews.in सोबत अपडेट रहा
बुलढाणा जिल्ह्यासह महाराष्ट्रातील ताज्या, विश्वासार्ह आणि सर्वात वेगवान बातम्या वाचण्यासाठी KattaNews.in नियमित भेट द्या.
👉 आपल्या मित्र-परिवारासोबत ही बातमी शेअर करा.










