बुलढाणा | प्रा. दिलीप नाईकवाड
सिंदखेडराजा तालुक्यातील दुसरबीड राहेरी येथील वाळू घाटावर LIVE वार्तांकन करत असताना पत्रकार रामदास कहाळे यांच्यावर मारहाण झाल्याचा आरोप समोर आल्यानंतर बुलढाणा जिल्ह्यात पत्रकारांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. पत्रकार सुरक्षा, वाळू घाटावरील कारवाया, पत्रकारांवरील वाढते हल्ले आणि प्रशासनाच्या भूमिकेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित होत असून या प्रकरणामुळे संपूर्ण जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पत्रकार रामदास कहाळे हे दुसरबीड राहेरी परिसरातील वाळू घाटावरील घडामोडींचे LIVE वार्तांकन करत होते. यावेळी वाळू वाहतूकदार कंत्राटदार आणि त्यांच्या साथीदारांनी त्यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप पत्रकार संघटनांनी केला आहे. या घटनेनंतर पत्रकार संघटना आक्रमक झाल्या असून दोषींवर तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
या प्रकरणी बुधवारी पत्रकार संघटनांनी उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांना निवेदन सादर केले. निवेदनात संबंधित आरोपींना तात्काळ अटक करावी तसेच पत्रकार रामदास कहाळे यांच्यावर दाखल करण्यात आलेला कथित खोटा गुन्हा मागे घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
पत्रकार संघटनांच्या मते, वार्तांकन करत असताना पत्रकारांवर हल्ले होणे ही लोकशाहीसाठी धोक्याची बाब असून पत्रकार संरक्षणासाठी प्रशासनाने ठोस भूमिका घेणे आवश्यक आहे. या घटनेमुळे तालुक्यातील पत्रकारांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सदर निवेदनावर मुकुंद पाठक, नंदू वाघमारे, गजानन मेहेत्रे, राहुल झोटे, देवानंद झोटे, भगवान साळवे, विजय भालमोडे, बुद्धू चौधरी, शेख जाकेर, सुरेश हुसे, ज्ञानेश्वर बुधवत, छगन झोरे, रफिक शेख, अनिल दराडे, रवी ढवळे यांच्यासह तालुक्यातील अनेक पत्रकारांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
दरम्यान, या प्रकरणात तात्काळ कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशारा पत्रकार संघटनांनी प्रशासनाला दिला आहे. त्यामुळे आता प्रशासन या प्रकरणात कोणती भूमिका घेते याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
👉 तुमच्या परिसरातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी KattaNews.in ला भेट द्या
स्थानिक बातम्या, ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, शेती, रोजगार आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या घडामोडी सर्वात आधी वाचा.










