बुलढाणा | विशाल गवई
राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकारकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील बोरी अडगाव येथील शेतकरी श्याम कीर्तने यांनी थेट राज्याचे कृषीमंत्री दत्ता भरणे यांना फोन करून आपल्या व्यथा मांडल्या. बियाण्यांमधील फसवणूक, पीक विमा योजनेतील बदल आणि नुकसानभरपाई न मिळाल्यामुळे शेतकरी संतप्त झाले असून, न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
खामगाव तालुक्यात यंदा मोठ्या प्रमाणात बियाण्यांबाबत तक्रारी समोर आल्या आहेत. अनेक शेतकऱ्यांना निकृष्ट दर्जाच्या बियाण्यांचा फटका बसल्याने दुबार पेरणी करण्याची वेळ आली. यामुळे उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली असून आर्थिक संकट अधिक गडद झाले आहे. शेतकऱ्यांच्या तक्रारी असूनही संबंधित कंपन्यांवर अद्याप कठोर कारवाई झालेली नसल्याने नाराजी वाढत आहे.
श्याम कीर्तने यांनी कृषीमंत्र्यांशी संवाद साधताना पीक विमा योजनेबाबतही गंभीर प्रश्न उपस्थित केले. मागील हंगामात तालुक्यातील सुमारे ८७ टक्के शेतकऱ्यांनी पीक विमा घेतला होता. मात्र, यावर्षी हे प्रमाण अवघ्या ९ ते १० टक्क्यांपर्यंत घसरल्याचे त्यांनी सांगितले. पूर्वीच्या पाच ट्रिगर पद्धतीमुळे शेतकऱ्यांना थेट लाभ मिळत होता. परंतु नवीन उत्पादित आधारित धोरणामुळे शेतकऱ्यांचा विमा योजनेवरील विश्वास कमी झाल्याचा दावा त्यांनी केला.
दरम्यान, वर्ष २०२३ मध्ये सोयाबीन पिकावर येलो मोझॅक रोगाचा मोठा प्रादुर्भाव झाला होता. त्यावेळी प्रशासनाकडून पंचनामे करण्यात आले, नुकसानाचे अहवाल तयार करण्यात आले आणि मदतीच्या घोषणा देखील झाल्या. मात्र, आजपर्यंत अनेक शेतकऱ्यांना प्रत्यक्ष आर्थिक मदत मिळालेली नसल्याचा आरोप शेतकरी संघटनांकडून करण्यात येत आहे.
सरकारने शेतकऱ्यांच्या अडचणींकडे गांभीर्याने लक्ष देऊन बियाणे फसवणूक प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करावी, पीक विमा धोरणाचा फेरविचार करावा आणि प्रलंबित नुकसानभरपाई तातडीने वितरित करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
शेतकऱ्यांच्या भावना आणि समस्या ऐकून घेतल्यानंतर कृषीमंत्री दत्ता भरणे यांनी सकारात्मक भूमिका घेतली. हा विषय यापूर्वीही त्यांच्या निदर्शनास आला असल्याचे सांगत त्यांनी स्वतः या संपूर्ण प्रकरणात लक्ष घालून आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
या चर्चेनंतर आता सरकार नेमकी कोणती पावले उचलते, याकडे बुलढाणा जिल्ह्यासह राज्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, आश्वासनांची पूर्तता झाली नाही तर न्याय्य हक्कांसाठी तीव्र आंदोलन उभारले जाईल, असा स्पष्ट इशारा शेतकरी प्रतिनिधींनी दिला आहे.
वाचकांसाठी महत्त्वाचे
शेती, पीक विमा, कृषी योजना, हवामान अपडेट, बाजारभाव आणि बुलढाणा जिल्ह्यातील ताज्या घडामोडींचे अचूक व विश्वासार्ह अपडेट्स मिळवण्यासाठी Kattanews.in नियमित वाचा.
Related News










