बुलढाणा/विशाल गवई, दि. 11 (जिमाका): ३८ वर्षांनंतर राज्याच्या कृषी विभागाला नवे बोधचिन्ह आणि घोषवाक्य प्राप्त झाले. ‘शाश्वत शेती – समृद्ध शेतकरी’ या घोषवाक्याचे आणि नव्या बोधचिन्हाचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे करण्यात आले.
यावेळी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री माणिकराव कोकाटे, मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री गिरीश महाजन, कृषी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, मुख्य सचिव राजेश कुमार, कृषी आयुक्त सुरज मांढरे यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.
“हा लोगो म्हणजे नव्या युगातील नव्या कृषी विचारांचा आरंभ” — दत्तात्रय भरणे
कृषी मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, “महाराष्ट्राची शेती परंपरागत असूनही सतत नव्या दिशेने वाटचाल करणारी आहे. कृषी विभागाचे हे नवे बोधचिन्ह म्हणजे केवळ प्रतीक नाही, तर महाराष्ट्राच्या शेतीचा आधुनिक चेहरा आहे. या लोगोमधून शेतकऱ्यांची शक्ती, तंत्रज्ञान आणि पर्यावरणपूरक विकासाचा संदेश दिला आहे.”
त्यांनी पुढे सांगितले, “हे बोधचिन्ह आणि घोषवाक्य राज्यातील प्रत्येक शेतकऱ्यांच्या प्रगतीचे प्रतीक बनेल. हा बदल म्हणजे ‘नव्या युगातील नव्या कृषी विचारांचा आरंभ’ आहे.”
३८ वर्षांपूर्वीचे बोधचिन्ह आता झाले इतिहासजमा
भरणे यांनी सांगितले की, “कृषी विभागाचे विद्यमान बोधचिन्ह सुमारे ३८ वर्षांपूर्वी तयार झाले होते. या काळात शेतीत तंत्रज्ञान, यांत्रिकीकरण, नैसर्गिक शेती आणि हवामानबदलामुळे मोठे परिवर्तन झाले. त्यामुळे विभागाची दृश्य आणि संवादात्मक ओळख अद्ययावत करणे गरजेचे झाले होते.”
यासाठी विभागाने खुली स्पर्धा आयोजित केली होती आणि जनतेकडून अनेक प्रस्ताव प्राप्त झाले. त्यातूनच आज राज्याच्या कृषी विभागाला नव्या युगाचे प्रतीक असलेले नवे बोधचिन्ह आणि घोषवाक्य प्राप्त झाले आहे.
🔗 Related News:















