बुलढाणा : प्रा.दिलीप नाईकवाड
अतिवृष्टीमुळे पिकांचे 100% नुकसान होऊनही पिक विमा मिळत नसल्याने बुलढाणा जिल्ह्यात शेतकऱ्यांचा संताप आता उफाळून आला आहे. सिंदखेडराजा, देऊळगाव राजा आणि लोणार तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठा एल्गार पुकारत 29 एप्रिलपासून आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. पिक विमा कंपनी आणि कृषी विभागाकडून ‘नुकसान झाले नाही’ असा दावा करण्यात येत असल्याने शेतकरी संतप्त झाले असून हा प्रश्न आता राज्यभर गाजण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सिंदखेडराजा येथील पंचायत समिती सभागृहात शेतकरी योद्धा कृती समितीच्या वतीने आयोजित बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. जिल्ह्यातील विविध भागांतील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीत शेतकऱ्यांनी स्पष्टपणे सांगितले की, खरीप 2025 हंगामात अतिवृष्टीमुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे, मात्र विमा कंपन्या आणि संबंधित विभागाकडून दावे फेटाळले जात आहेत.
या अन्यायाविरोधात आवाज उठवत 29 एप्रिलपासून अन्नत्याग आमरण उपोषण करण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. तसेच 1 मे महाराष्ट्र दिनी काळीगुडी उभारून शासनाचा निषेध करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
शेतकरी योद्धा कृती समितीने राज्याचे मुख्यमंत्री आणि कृषिमंत्र्यांना तातडीने हस्तक्षेप करण्याचे आवाहन केले आहे. शेतकऱ्यांशी थेट चर्चा करून पिक विम्याचा प्रश्न मार्गी लावावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करून टप्प्याटप्प्याने पुढे नेले जाईल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, शेतकऱ्यांनी एकजूट दाखवत या लढ्यात मोठ्या प्रमाणावर सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बुलढाणा जिल्ह्यातील हा मुद्दा आता संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे.
👉 हे आवश्यक करा..
तुमच्या भागातही पिक विम्याबाबत अडचणी आहेत का? तुमचा अनुभव आम्हाला पाठवा आणि ही बातमी जास्तीत जास्त शेअर करा.












