साखरखेर्डा | २७ जानेवारी २०२६
आजारी बाप अंथरुणाला खिळलेला असताना, अवघ्या १४ वर्षांच्या मुलाने ई-पीक नोंदीसाठी रात्री अंधारात शेतात उतरावे लागणे हे धाडस नसून व्यवस्थेचे अपयश असल्याचे बोलले जात आहे.शेतकरी जनार्धन साहेबराव नागरे हे गंभीर आजारामुळे एकाच ठिकाणी खिळले आहेत. कुटुंबाची संपूर्ण शेती जबाबदारी त्यांच्या अल्पवयीन मुलावर येऊन पडली आहे.
शिक्षणाच्या वयात असलेला आदित्य जनार्धन नागरे हा मुलगा शाळेची पुस्तके बाजूला ठेवून बापाच्या जागी उभा राहिला आहे.
२४ जानेवारी २०२६ ही ई-पीक पेरणी नोंदीची शेवटची तारीख होती. दिवसा ई-पीक साईट बंद असल्याने, रात्री साधारण ११ वाजता आदित्यने जीव मुठीत धरून गट क्रमांक १२५, १२८ व २१३ मधील गहू व हरभरा पिकांची ई-पीक नोंद केली.
२५ जानेवारी २०२६ रोजी ई-पीक साईट पूर्णपणे बंद झाल्याने मुदतवाढ मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. जर त्या रात्री ही नोंद झाली नसती, तर भविष्यात अतिवृष्टी, गारपीट किंवा नैसर्गिक आपत्ती आल्यास या शेतकरी कुटुंबाला शासनाकडून कोणतीही मदत मिळण्याचा मार्गच बंद झाला असता.
विशेष म्हणजे, या परिसरात काही दिवसांपूर्वी बिबट्याचा वावर असल्याची माहिती असतानाही, कोणतेही संरक्षण नसताना अंधारात शेतात उतरणे हे धाडस नसून व्यवस्थेची मजबुरी असल्याची भावना शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे.
त्या रात्री आदित्यने केलेली ई-पीक नोंद ही वेदनादायक असली तरी, ती शेतकरी कुटुंबाच्या उद्याच्या आधारासाठी केलेली शेवटची धडपड होती.
आज हा प्रश्न एका मुलाचा असला, तरी उद्या तो संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी कुटुंबांचा प्रश्न ठरू शकतो.
यामुळे परिसरातील शेतकरी ठामपणे मागणी करत आहेत की, ई-पीक पेरणीची नोंद राज्य सरकारने स्वतः करावी, जेणेकरून कोणत्याही शेतकऱ्याच्या पोराला शिक्षणासोबत शेतीची जबाबदारी अंधारात, भीतीत आणि मजबुरीत उचलावी लागू नये.
ई-पीक नोंदीची संपूर्ण जबाबदारी शासनाने स्वतः घेतल्यास अशा वेदनादायक घटना टाळता येतील, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
हे पण वाचा.
- Chikhali : लग्नाचे आमिष, नंतर नकार; धक्कादायक! २० वर्षीय तरुणीची आत्महत्या
- राष्ट्रध्वजाला मानवंदना देतानाच शाळेच्या मुख्याध्यापकाचा मृत्यू; मोहेगाव गावावर शोककळा
- बुलढाणा जिल्ह्यात स्प्रिंकलर तोट्या चोरी प्रकरणी मोठी कारवाई! 8 गुन्ह्यांची उकल, दोघे अटकेत – 80 हजारांचा मुद्देमाल जप्त
📢 वाचकांसाठी आवाहन :
ही बातमी जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून शेतकरी कुटुंबांचे वास्तव शासनापर्यंत पोहोचेल.















