चिखली |समाधान सरकटे
दोन वर्षांपासून पाण्याच्या तीव्र टंचाईने होरपळलेल्या मंगरूळ गावातील नागरिकांचा संयम अखेर संपला आहे. शासनाकडून मंजूर झालेल्या तब्बल ६७ लाख रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेनंतरही गावात थेंबभर पाणी मिळत नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी पंचायत समिती कार्यालय, चिखली समोर आमरण उपोषण सुरू केले आहे. “पाणी द्या, अन्यथा आंदोलन तीव्र करू,” असा इशारा ग्रामस्थांनी प्रशासनाला दिला आहे.
माहितीनुसार, सन २०२१ मध्ये मंगरूळ गावासाठी पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत पाईपलाईन टाकणे, विहीर खोदणे आणि वीज कनेक्शन देणे अपेक्षित होते. मात्र, प्रत्यक्षात या योजनेची अंमलबजावणी अत्यंत निकृष्ट दर्जाची झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
ग्रामस्थांच्या मते, ठेकेदार आणि ग्रामपंचायत प्रतिनिधी यांच्या संगनमतामुळे पाईपलाईन चुकीच्या व बुडीत क्षेत्रातून टाकण्यात आली. त्यामुळे वारंवार गळती होत असून पाणीपुरवठा पूर्णपणे ठप्प झाला आहे. लाखो रुपये खर्चूनही गावातील नागरिकांना पाण्यासाठी अजूनही वणवण भटकंती करावी लागत आहे.
या गंभीर परिस्थितीबाबत ग्रामस्थांनी यापूर्वी प्रशासनाला अनेकदा निवेदने दिली होती. तसेच ५ मेपासून उपोषणाचा इशाराही देण्यात आला होता. मात्र, ग्रामपंचायत आणि संबंधित विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने अखेर ग्रामस्थांनी उपोषणाचा मार्ग स्वीकारला.
गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या पाणीटंचाईमुळे महिलांना आणि शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. दररोज पाण्यासाठी लांब अंतर पार करावे लागत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
“शासनाचा पैसा अक्षरशः पाण्यात गेला आहे. दोषींवर कठोर कारवाई व्हावी आणि तात्काळ शाश्वत पाणीपुरवठा सुरू करावा, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र केले जाईल,” असा इशारा आंदोलक ग्रामस्थांनी दिला आहे.
👉 Related News
📢 हे नक्की करा..
तुमच्या परिसरातील अशाच समस्यांबाबत आम्हाला कळवा. तुमची बातमी थेट Kattanews.in वर प्रसिद्ध केली जाईल.













