खामगाव | विशाल गवई
खामगाव तालुक्यातील जयपूर लांडे शिवारात घडलेल्या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. शेळ्या चराईसाठी गेलेल्या १३ वर्षीय मुलाचा तलावात पोहताना गाळात अडकल्याने मृत्यू झाला. रविवारी सकाळी घडलेल्या या घटनेने गावावर शोककळा पसरली आहे.
जयपूर लांडे येथील समर्थ मंगलसिंग पवार (वय १३) हा सकाळी शेळ्या घेऊन शिवारात गेला होता. उन्हाचा तडाखा वाढत असल्याने तो परिसरातील फादर कॉलनी तलावात पोहण्यासाठी उतरला. सुरुवातीला तो सहज पोहत होता. मात्र काही वेळातच तलावातील खोल भागातील गाळात त्याचा पाय अडकला.
गाळात फसल्यामुळे त्याला बाहेर येता आले नाही. हा प्रकार लक्षात येताच स्थानिकांनी धाव घेत त्याला बाहेर काढले. त्यानंतर उपचारासाठी तातडीने खामगाव येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले.
या घटनेनंतर जयपूर लांडे परिसरात शोक व्यक्त करण्यात येत आहे. अल्पवयीन मुलाचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने गावकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. समर्थच्या निधनामुळे पवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
याप्रकरणी निशांत प्रतापसिंग पवार यांनी खामगाव शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम १७४ नुसार अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास पोहेकॉ मधुकर पवार करीत आहेत.
दरम्यान, उन्हाळ्यात तलाव आणि पाणीसाठ्यांमध्ये पोहताना विशेष काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. विशेषतः लहान मुलांनी एकटे पाण्यात उतरू नये, असेही सांगण्यात आले आहे.
Related News
- साखरखेर्ड्यात डिझेलसाठी हाहाकार! पेट्रोल पंपावर वाहनांसोबत ड्रम-कॅनच्या लांबच लांब रांगा
- चिखलीत पोलिसांचा रात्रीचा धाडसी छापा! घरातून 2.78 किलो गांजा जप्त; राऊतवाडीत खळबळ
- रात्री १ वाजता काळाने गाठलं; भरधाव कारखाली दोन सुरक्षारक्षकांचा दुर्दैवी अंत
अशाच ताज्या आणि विश्वासार्ह स्थानिक बातम्यांसाठी Kattanews.in ला नियमित भेट द्या.











