लोणार |विनायक कुटे
लोणार तालुक्यात सध्या अवैध वाळू वाहतुकीचा मुद्दा चांगलाच तापला असून, प्रशासनाच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कागदोपत्री कारवाईचे दावे केले जात असले, तरी प्रत्यक्षात त्याचा परिणाम दिसत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर शहर संघटक तानाजी अंबादास मापारी यांनी ठाम भूमिका घेत प्रशासनाला थेट इशारा दिला आहे.
“कारवाई होत असेल, तर ती जनतेला दिसली पाहिजे. आणि जर ती दिसत नसेल, तर तिचा स्पष्ट हिशोब दिला पाहिजे,” असा स्पष्ट संदेश मापारी यांनी दिला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे लोणार तालुक्यातील वाळू माफिया प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे.
मापारी यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी नेमण्यात आलेल्या पथकांची सविस्तर माहिती जाहीर करण्याची मागणी केली आहे. पथकांची संख्या, कार्यक्षेत्र, संबंधित अधिकारी-कर्मचारी, तसेच त्यांच्या ड्युटी वेळा व जबाबदाऱ्या याची लेखी माहिती नागरिकांसमोर ठेवावी, असे त्यांनी स्पष्टपणे नमूद केले आहे.
ही मागणी केवळ विरोधासाठी नसून, प्रशासनावर जनतेचा विश्वास वाढवण्यासाठी असल्याचे त्यांनी सांगितले. पारदर्शकता राखली गेली, तरच नागरिकांचा प्रशासनावर विश्वास दृढ राहील, असेही त्यांनी अधोरेखित केले.
अवैध वाळू उपसा हा केवळ कायद्याचा प्रश्न नसून, पर्यावरण आणि सामाजिक समतोलासाठी मोठा धोका आहे. त्यामुळे यावर तातडीने आणि ठोस कारवाई करणे गरजेचे असल्याची भावना व्यक्त होत आहे.
दरम्यान, प्रशासनाने या निवेदनाची गांभीर्याने दखल घेऊन आवश्यक ती कारवाई करावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. आता प्रशासन या प्रकरणात किती पारदर्शक भूमिका घेतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.














