लोणार प्रतिनिधी |२२ मार्च २०२६
अवकाळी पाऊस आणि गारपीट यामुळे लोणार तालुक्यातील शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढवले आहे. रब्बी हंगामातील पिके काढणीच्या टप्प्यावर असताना झालेल्या या पावसामुळे ८८४ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले असून १५९४ शेतकरी अडचणीत सापडले आहेत.
वझर आघाव, कासारी, येवती, चिंचोली सांगळे, पारडा दराडे, देऊळगाव कुंडपाळ, खुरमपूर, अजिसपुर, धायफळ या भागांमध्ये गारपीट व वादळी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती आहे.
सलग दोन दिवस विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसामुळे टरबूज व कांदा पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी शेतांमध्ये पाणी साचल्याने उभ्या पिकांवर विपरीत परिणाम झाला आहे.
दरम्यान, या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला असून प्रशासनाकडून पंचनामे सुरू करण्याची मागणी होत आहे.










