साखरखेर्डा (प्रतिनिधी) ७ मार्च २०२६
साखरखेर्डा गावाचे नाव साहित्यविश्वात उजळवणारे प्रख्यात मराठी कवी आणि नामवंत निवेदक अजीम नवाज राही यांना त्यांच्या ‘वळीवाच्या वेळा’ या गाजत असलेल्या कवितासंग्रहासाठी प्रतिष्ठेचा लोकनेते राजारामबापू पाटील उत्कृष्ट वाड्मय पुरस्कार 2025 जाहीर झाला आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल साखरखेर्डा पोलीस स्टेशनच्या वतीने त्यांचा जिव्हाळ्याचा सत्कार करण्यात आला.
साखरखेर्डा पोलीस स्टेशनच्या मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात ठाणेदार गजानन दिगंबरराव करेवाड आणि दुय्यम ठाणेदार संदीप मेंधणे यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन अजीम नवाज राही यांचा सत्कार केला. यावेळी बोलताना ठाणेदार गजानन करेवाड म्हणाले की, अजीम नवाज राही यांच्या लेखणीने आणि वाणीने साखरखेर्डा गावाच्या नावाभोवती मान-सन्मानाचे वलय निर्माण केले आहे. त्यांच्या कवितेत सर्वसामान्य माणसाच्या कष्टाळू जीवनाचे वास्तव चित्रण दिसते आणि त्यांच्या शब्दांत जीवनातील सत्यता स्पष्टपणे उमटते.
सत्काराच्या उत्तरादाखल कवी अजीम नवाज राही यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, ज्या साखरखेर्डा गावात माझा जन्म झाला आणि ज्या गावाने मला घडवले त्या गावच्या मातीचा सृजनशील सुगंध माझ्या संपूर्ण शब्दप्रवासात भरून राहिला आहे. गावकऱ्यांचे प्रेम आणि विश्वास मला सतत नवी ऊर्जा देत राहतो. त्यांच्या प्रेमामुळेच प्रतिकूल परिस्थितीतही जटील आव्हानांचा सामना करण्याची ताकद मला मिळाली आहे.
याच महिन्यात शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला 18 फेब्रुवारी रोजी साखरखेर्डा सार्वजनिक उत्सव समितीच्या वतीने अजीम नवाज राही यांना ‘अमोघ शब्दधन’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. आता साखरखेर्डा पोलीस स्टेशनच्या वतीने झालेला हा सत्कार गावकऱ्यांसाठीही अभिमानाचा क्षण ठरला आहे.
साहित्य, संस्कृती आणि काव्याच्या माध्यमातून साखरखेर्डा गावाचे नाव राज्यभर पोहोचवणाऱ्या अजीम नवाज राही यांच्या या यशामुळे संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून गावकऱ्यांनी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.
Related News
- मेहकर MIDC परिसरात युवकाचा दगडाने ठेचून खून; प्रेमप्रकरणाची चर्चा
- सिंदखेड राजात आनंद राजपूत यांचा तालुका अध्यक्ष पदावर षटकार
- धोडप बु. येथील अल्पभूधारक शेतकऱ्याची आत्महत्या; गावावर शोककळा
👉 अशाच ताज्या, विश्वासार्ह आणि स्थानिक बातम्यांसाठी Kattanews.in ला दररोज भेट द्या.










