बुलढाणा|२३ फेब्रुवारी २०२६
लोणार तालुक्यातील चिखला काकड येथे शिवाजी महाराज पुतळा वाद प्रकरणामुळे वातावरण तापले असून या पार्श्वभूमीवर शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुख जयश्री दीपक कायंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. नेत्यांच्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त करत त्यांनी थेट माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे राजीनामा पाठविल्याने बुलढाणा जिल्ह्यात राजकीय खळबळ उडाली आहे.
चिखला काकड येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याशी संबंधित वादामुळे राज्यभर चर्चा सुरू आहे. या प्रकरणात शिवसेना शिंदे गटाचे नेते व माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांच्या भूमिकेमुळे आपण अस्वस्थ झाल्याचे कायंदे यांनी आपल्या राजीनामा पत्रात नमूद केले आहे.
शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनुसार सर्व समाजांना सोबत घेऊन काम करण्याची गरज आहे; मात्र सध्याच्या घडामोडींमुळे सामाजिक सलोखा धोक्यात येण्याची भीती निर्माण झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.
तसेच वंजारी समाजाला लक्ष्य केल्याचा आरोप करत कोणतीही शहानिशा न करता एकतर्फी भूमिका घेतली गेल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे. या परिस्थितीत अशा नेतृत्वाखाली काम करणे योग्य नसल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे.
सामाजिक ऐक्य व समाजभावना जपण्यासाठी आपण पदाचा राजीनामा देत असल्याचे सांगत त्यांनी आपला राजीनामा मंजूर करण्याची विनंती केली आहे. त्यांच्या या निर्णयामुळे राजकीय व सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.
👉 तुमच्या परिसरातील ताज्या बातम्या सर्वात आधी वाचण्यासाठी
Kattanews.in ला दररोज भेट द्या आणि WhatsApp वर शेअर करा.
Related News










