बुलढाणा | दि. 26 जानेवारी
विकसित भारत 2047 च्या दिशेने देश वाटचाल करत असताना ‘आत्मनिर्भर बुलढाणा’ घडवण्यासाठी प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी एकजुटीने काम करण्याचा संकल्प करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील यांनी केले.
देशाच्या 77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त बुलढाणा येथील पोलीस कवायत मैदानावर झालेल्या मुख्य शासकीय समारंभात जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी ते उपस्थितांना संबोधित करत होते.
यावेळी आमदार संजय गायकवाड, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात, पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर जिल्हाधिकारी सुधीर खांदे यांच्यासह प्रशासनातील अधिकारी, स्वातंत्र्यसैनिक, वीरमाता, वीरपत्नी, विद्यार्थी, पत्रकार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ.किरण पाटील म्हणाले की, भारत आज जगातील सर्वात मोठा लोकशाही देश असण्यासोबतच जागतिक अर्थव्यवस्थेतही महत्त्वाचे स्थान निर्माण करत आहे. महाराष्ट्र हे देशाच्या विकासाचे ग्रोथ इंजिन असून, या विकासयात्रेत बुलढाणा जिल्हाही आत्मविश्वासाने पुढे जात आहे.
शेती, उद्योग, शिक्षण, महिला सक्षमीकरण, युवक विकास आणि डिजिटल सेवा या क्षेत्रात जिल्ह्याने उल्लेखनीय प्रगती केली आहे. पारंपरिक शेतीसोबत फळबाग लागवड ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
जिल्ह्यात खरीप व रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात पेरणी झाली असून महात्मा गांधी रोजगार हमी योजना व भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेंतर्गत हजारो हेक्टरवर फळबाग लागवड करण्यात आली आहे.
नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी शासन खंबीरपणे उभे असून 429 कोटी रुपयांची मदत वितरित करण्यात आली आहे. यासोबतच 702 कोटी रुपयांचे पीककर्ज शेतकऱ्यांना देण्यात आले आहे.
जिगांव सिंचन प्रकल्पासाठी भूसंपादन वेगाने सुरू असून हजारो कोटी रुपये शेतकऱ्यांना अदा करण्यात आले आहेत. लोणार सरोवराच्या संवर्धनासाठी आयआयटी मुंबईच्या सहकार्याने संशोधन सुरू असल्याची माहितीही जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.
युवकांना संबोधित करताना डॉ.किरण पाटील म्हणाले की, आजचा युवक नोकरी शोधणारा नाही तर नोकरी देणारा बनू शकतो. स्टार्टअप इंडिया, स्किल इंडिया, अॅग्री-स्टार्टअप्स आणि डिजिटल सेवा क्षेत्रात अपार संधी उपलब्ध आहेत.
डिजिटल प्रशासनाच्या दिशेने ‘महसूल मित्र – व्हॉट्सॲप चॅटबॉट सेवा’ सुरू करण्यात आली असून नागरिकांना विविध सेवा ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
कार्यक्रमानंतर जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील यांनी पोलीस परेडची पाहणी करत मानवंदना स्वीकारली. यावेळी विविध विभागातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.
2047 पर्यंत भारत विकसित राष्ट्र बनेल आणि त्या विकासगाथेत बुलढाणा जिल्ह्याचे नाव सुवर्ण अक्षरात कोरले जाईल, असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील यांनी व्यक्त केला.
📌 हे पण वाचा
🗣️ तुमचे मत काय?
आत्मनिर्भर बुलढाण्याच्या या संकल्पाबाबत तुमचे मत खाली कमेंटमध्ये नक्की कळवा. अशीच स्थानिक, विश्वासार्ह आणि वेगवान बातमी वाचण्यासाठी Kattanews.in ला नियमित भेट द्या.











