नारायणराव आरु पाटील| वाशिम जिल्हा प्रतिनिधी
रिसोड तालुक्यातील भर जहागीर गाव येथे घाणीचे साम्राज्य पसरले असून ग्रामपंचायत प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे नागरिक संतप्त झाले आहेत.
गावातील वॉर्ड क्रमांक ४ मध्ये कचऱ्याचे ढीग, सांडपाण्याची तळी आणि तीव्र दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
या स्वच्छता समस्येबाबत लेखी निवेदन देऊनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नसल्याने स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
रिसोड तालुक्यातील भर जहागीर गावातील ही परिस्थिती पाहता प्रशासनाची भूमिका केवळ कागदोपत्री मर्यादित असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
कचऱ्याचे ढीग, साचलेले सांडपाणी, डासांचा प्रादुर्भाव आणि दुर्गंधी यामुळे परिसरात राहणाऱ्या नागरिकांचे जगणे अक्षरशः असह्य झाले आहे.
याबाबत ग्रामपंचायत अधिकारी, गटविकास अधिकारी आणि तहसील प्रशासन यांच्याकडे वेळोवेळी तक्रारी व निवेदने देण्यात आली आहेत.
तरीही अद्याप एकही ठोस पाऊल उचलले गेले नसल्याने लोकशाही व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
‘स्वच्छ भारत अभियान’चा गाजावाजा केला जात असला तरी प्रत्यक्षात मात्र भर जहागीर गावातील वास्तव अत्यंत विदारक असल्याचे चित्र दिसून येत आहे.
प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असून, एखादी साथीची रोगराई पसरल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांवर राहील, असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.
तात्काळ स्वच्छता मोहीम राबवून दुर्गंधी दूर करावी व जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अन्यथा ग्रामपंचायत कार्यालय व तहसील कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही देण्यात आला आहे.
हे निवेदन ७ नोव्हेंबर २०२५ रोजी भर जहागीर येथील प्रमोद सभादिंडे यांनी गटविकास अधिकारी पंचायत समिती रिसोड व तहसीलदार रिसोड यांना दिले होते.
📢 तुमच्या गावातील समस्या आमच्यापर्यंत पोहोचवा
तुमच्या परिसरातील प्रशासनिक दुर्लक्ष, समस्या किंवा बातमी असल्यास KattaNews.in वर पाठवा.
लोकांचा आवाज लोकांपर्यंत पोहोचवणे हेच आमचे ध्येय आहे.
🔗 संबंधित बातम्या












