कट्टा न्यूज नेटवर्क/प्रतिनिधी
शिक्षकांना शिकवणं सोडून कुत्र्यांची पाळत ठेवावी लागणार असल्याने शिक्षण व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
शिक्षकांना शिकवणं सोडून कुत्र्यांची पाळत ही जबाबदारी देणारा हा शिक्षण विभागाचा अजब आणि धक्कादायक निर्णय असल्याची तीव्र प्रतिक्रिया उमटते आहे.भटक्या कुत्र्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला असून कुत्र्यांच्या हल्ल्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.
विशेषतः लहान मुलांवर होणारे हल्ले आणि रेबीजमुळे होणारे मृत्यू ही गंभीर बाब ठरत आहे.
याच पार्श्वभूमीवर शाळेच्या परिसरात भटक्या कुत्र्यांवर लक्ष ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असला,
तरी त्याची जबाबदारी थेट शिक्षकांवर टाकण्यात आल्याने संताप व्यक्त केला जात आहे.अमरावती महापालिकेच्या शिक्षण विभागाने जारी केलेल्या आदेशानुसार,
शाळेच्या आवारातील भटक्या कुत्र्यांवर पाळत ठेवण्यासाठी शिक्षकांना नोडल अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात येणार आहे.
कुत्र्यांच्या संख्येची नोंद, त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवणे, तसेच संबंधित यंत्रणेशी समन्वय साधण्याची जबाबदारी शिक्षकांवर टाकण्यात आली आहे.
इतकेच नव्हे तर शाळेच्या दर्शनी भागात संबंधित शिक्षकांचे नाव आणि संपर्क क्रमांक लावण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.
हा आदेश सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांचा हवाला देत काढण्यात आल्याचे सांगितले जात असले,
तरी प्रत्यक्षात शिक्षकांच्या मूळ कामावर याचा गंभीर परिणाम होणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिक्षण द्यायचे की भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करायचा, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
या निर्णयावर प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू आणि काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी तीव्र शब्दांत टीका केली आहे.
हा निर्णय लज्जास्पद आणि हास्यास्पद असल्याचे सांगत,
शिक्षकांना त्यांच्या मूळ कामापासून दूर नेण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
सरकारने तात्काळ हा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
हे पण वाचा..
देशातील अनेक राज्यांमध्ये भटक्या कुत्र्यांचा प्रश्न गंभीर असला,
तरी त्यासाठी शिक्षकांवर जबाबदारी टाकणे कितपत योग्य आहे, यावर मोठा वाद निर्माण झाला आहे.
दिल्ली आणि छत्तीसगडमध्येही अशा प्रकारचे प्रयोग झाले असले,
तरी अमरावतीतील हा निर्णय शिक्षण व्यवस्थेच्या दृष्टीने धोकादायक ठरू शकतो, अशी भावना व्यक्त होत आहे.
शिक्षकांना कुत्र्यांची पाळत ठेवण्याची जबाबदारी देणं योग्य आहे का?
खाली कमेंट करून तुमचं मत नक्की कळवा आणि ही बातमी शेअर करा.













