साखरखेर्डा,प्रतिनिधी | समाधान सरकटे
दररोज अनेक शेतकरी आजारी जनावरे घेऊन उपचारासाठी येथे येतात. मात्र, दवाखाना बंद असल्याने त्यांना उपचारासाठी इतर ठिकाणी जावे लागत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. त्यामुळे वेळ, पैसा आणि वाहतुकीचा अतिरिक्त खर्च सहन करावा लागत असल्याचे पशुपालकांचे म्हणणे आहे.
सध्या पावसाळ्याचा हंगाम सुरू असून या काळात जनावरांमध्ये विविध संसर्गजन्य आजारांचे प्रमाण वाढते. तसेच गर्भार जनावरांची प्रसूती, अपघात किंवा इतर आपत्कालीन परिस्थितीत तातडीची पशुवैद्यकीय सेवा आवश्यक असते. मात्र, स्थानिकांच्या म्हणण्यानुसार आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने पशुपालकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार, साखरखेर्डा येथे पशुवैद्यकीय दवाखान्याची इमारत तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थाने उपलब्ध आहेत. मात्र, या परिसराची योग्य देखभाल होत नसल्याने स्वच्छतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. संबंधित विभागाने याकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
याबाबत शिंदी येथील माजी उपसरपंच गंभीर खरात, शिवसेना विभागप्रमुख दिलीप सोभागे, युवा सेना तालुका प्रमुख संदीप मगर आणि उपसरपंच संग्रामसिंह राजपूत यांनी १५ ऑगस्टपर्यंत पशुवैद्यकीय अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक व परिचारक यांच्या नियुक्त्या करून दवाखाना सुरू न झाल्यास दवाखाना परिसरात गुरांसह शेकडो शेतकऱ्यांसोबत बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
📢 KattaNews.in वाचा, अपडेट राहा
बुलढाणा, महाराष्ट्र, शेती, सरकारी योजना, स्थानिक राजकारण, गुन्हे, शिक्षण आणि ब्रेकिंग न्यूजचे सर्वात विश्वासार्ह अपडेट्स मिळवण्यासाठी KattaNews.in ला नियमित भेट द्या.










