सिंदखेडराजा (बुलढाणा) |प्रा.दिलीप नाईकवाड
सिंदखेडराजा तालुक्यातील रोपवाटिकांमध्ये लागोपाठ लागणाऱ्या आगींमुळे मोठा संशय निर्माण झाला आहे. निमगाव वायाळ येथे तब्बल ५ हेक्टरमधील ५५५५ रोपे जळून खाक झाली असून, ही आग नैसर्गिक की जाणूनबुजून लावलेली, असा ज्वलंत प्रश्न आता उपस्थित होत आहे.
याआधी काळापाणी येथील अमृतवन रोपवाटिका जळाल्यानंतरही कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. त्यामुळेच आता पुन्हा अशीच घटना घडल्याने “हा अपघात नसून कटकारस्थान आहे का?” अशी चर्चा नागरिकांमध्ये जोर धरत आहे.
सामाजिक कार्यकर्ते गजानन कहाळे यांनी या प्रकरणी मुख्य वनसंरक्षक अमरावती यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली असून, उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे. मात्र अद्याप कोणतीही ठोस चौकशी सुरू नसल्याने प्रशासनावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
२०२३ पासून शासनाने लाखो रुपयांचा निधी खर्च करून ही रोपवाटिका उभारली होती. तरीदेखील जाळरेषा न करणे, गवत साफ न करणे यासारख्या प्राथमिक उपाययोजना न केल्याने हा प्रकार घडल्याचा आरोप होत आहे.
“जर वेळेत योग्य कामं झाली असती तर हजारो रोपे वाचली असती” असे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. तसेच काही जणांनी हा प्रकार भ्रष्टाचार लपवण्यासाठी मुद्दाम घडवला गेला असल्याची शक्यता व्यक्त केली आहे.
या आगीत केवळ रोपेच नाही तर लहान सजीव, पक्षी आणि वन्यजीवही होरपळून गेले आहेत. पर्यावरण संरक्षणासाठी खर्च होणारा निधी आणि यंत्रणा यावरही आता प्रश्न उपस्थित होत आहेत.
“सरकारी पैशांची अशी राख होत असेल, तर जबाबदार कोण?” हा संतप्त सवाल आता जनतेतून विचारला जात आहे.
या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी वाढत आहे. आता प्रशासन काय पावले उचलते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
📢 Related News
- बुलढाणा तणावग्रस्त! आमदार संजय गायकवाडांच्या घराबाहेर आंदोलन उफाळलं; पोलिसांशी झटापट, अनेक जण ताब्यात
- Breaking: प्रशांत आंबी चिखलीत डिटेन; बुलढाण्यात गायकवाडांविरोधात मोठं आंदोलन पेटलं
- मोठा दिलासा! १ जानेवारी २०११ पूर्वीची घरांची अतिक्रमणे होणार कायदेशीर — अर्जाची शेवटची तारीख जाहीर
👉 हे आवश्यक करा..
अशाच ब्रेकिंग आणि तपासात्मक बातम्यांसाठी Kattanews.in ला भेट देत रहा. ही बातमी शेअर करा आणि तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा.









