सिंदखेडराजा|३ एप्रिल २०२६
खडकपूर्णा बंधारा, पाणी सोडले, कोल्हापुरी बंधारा तोडफोड या घटनेमुळे बुलढाणा जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. लिंगा-देवखेड परिसरातील खडकपूर्णा नदीवरील बंधाऱ्याच्या प्लेटा काढून पाणी सोडल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी १ आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे, तर ३ जण फरार झाले आहेत. या घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण असून रब्बी हंगाम धोक्यात आला आहे.
सदर घटना १ एप्रिल रोजी मध्यरात्री घडली. ताडशिवनी येथील शेतकरी तात्यासाहेब देशमुख हे आपल्या शेताला पाणी देण्यासाठी रात्री गेले असता त्यांनी काही व्यक्तींना बंधाऱ्याच्या लोखंडी प्लेटा काढताना पाहिले. त्यांनी तत्काळ इतर शेतकऱ्यांना बोलावून एका आरोपीला पकडले, तर उर्वरित तीन आरोपी अंधाराचा फायदा घेत फरार झाले.
पकडण्यात आलेल्या आरोपीचे नाव देवानंद डिघोळे (वय २५) असे असून दत्ता दराडे, शाम डिघोळे आणि किरण थोरवे हे तिघे फरार आहेत. आरोपींनी वापरलेल्या वाहनाचा क्रमांकही समोर आला असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
या प्रकारामुळे बंधाऱ्यातील मोठ्या प्रमाणावर पाण्याची नासाडी झाली आहे. काही दिवसांपूर्वीच शेतकऱ्यांच्या मागणीनुसार खडकपूर्णा धरणातून पाणी सोडण्यात आले होते. त्यामुळे परिसरातील कोल्हापुरी बंधाऱ्यांमध्ये पाणी साठवून शेतीसाठी आणि पिण्यासाठी उपयोग होणार होता. मात्र या तोडफोडीमुळे पुन्हा पाणीटंचाई निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, या प्रकरणाशी संबंधित एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली असून त्यामध्ये बंधाऱ्याच्या प्लेटा काढण्याचे निर्देश दिल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे या घटनेमागे रेती माफियांचा हात असल्याची चर्चा रंगली आहे.
या घटनेमुळे संतप्त शेतकऱ्यांनी दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलमानुसार गुन्हा दाखल केला असून फरार आरोपींचा शोध सुरू आहे.












