साखरखेर्डा प्रतिनिधी|२२ मार्च २०२६
साखरखेर्डा आग्या मोहळ घटनेने बुलढाणा जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. साखरखेर्डा येथील आठवडी बाजारात अचानक आग्या मोहळ उठल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. या घटनेत 15 ते 20 जण जखमी झाले असून अनेकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
आज 20 मार्च रोजी सकाळी 11 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. आठवडी बाजार सुरू असताना व्यापारी व ग्राहकांची मोठी गर्दी होती. याचवेळी बाजारातील पिंपळाच्या झाडावर असलेले आग्या मोहळ अचानक उठले आणि काही समजण्याच्या आतच अनेकांना दंश केला.
या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे बाजारात एकच गोंधळ उडाला. नागरिक सैरावैरा पळू लागले. व्यापाऱ्यांनी आपली दुकाने सोडून जीव वाचवण्यासाठी धाव घेतली. या प्रकारात सुमारे 15 ते 20 नागरिक जखमी झाले असून त्यांनी तातडीने रुग्णालयात उपचार घेतले.
दरम्यान, काल 19 मार्च रोजीही अशीच घटना घडली होती. बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँक शाखा साखरखेर्डा येथील गच्चीवरील आग्या मोहळ उठल्याने एका वयोवृद्ध व्यक्तीवर हल्ला झाला. झिने नामक व्यक्ती गंभीर जखमी झाली होती.
स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदत करत त्यांच्या अंगावर चादर टाकून बचाव केला. अमित जाधव, बबलू पवार आणि इतर युवकांनी जखमींना प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. नंतर त्यांना बुलढाणा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले.
सध्या साखरखेर्डा परिसरात अनेक ठिकाणी आग्या मोहळ दिसून येत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. संबंधित प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून आग्या मोहळाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
👉 आपल्या परिसरातील अशाच ताज्या बातम्यांसाठी Kattanews.in ला भेट द्या.
Related News










