मुंबई | २ जानेवारी २०२६
मुंबईत वास्तव्यास असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील बौद्ध बांधवांसाठी हक्काचे, एकतेचे आणि अस्मितेचे प्रतीक ठरणारे
“बुलढाणा भवन” उभारण्याचा ऐतिहासिक संकल्प लवकरच साकार होणार आहे.
पुढील वर्षी होणाऱ्या वार्षिक स्नेहसंमेलनात मुंबईत बुलढाणा भवनाचे भूमिपूजन करण्यात येईल,
असा ठाम विश्वास मेहकर विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. सिद्धार्थ खरात यांनी व्यक्त केला.
हा विश्वास त्यांनी बुलढाणा जिल्हा बौद्ध रहिवासी समाज मंडळ, मुंबई यांच्या वतीने आयोजित
वार्षिक स्नेहसंमेलनात प्रमुख अतिथी म्हणून बोलताना दिला.
दिनांक १ फेब्रुवारी रोजी मुंबईतील दादर येथील
डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे
बुलढाणा जिल्हा बौद्ध रहिवासी समाज मंडळाच्या वतीने
भव्य आणि प्रेरणादायी वार्षिक स्नेहसंमेलन पार पडले.
या संमेलनास प्रमुख उपस्थिती म्हणून
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर,
मेहकर मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ खरात,
राजेश गव्हांदे (IFS),
सेवानिवृत्त अधिकारी एच. बी. तायडे,
भिमराव तायडे,
रामकृष्ण रजाने,
डॉ. दयानंद इंगळे (अध्यक्ष)
यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना आनंदराज आंबेडकर म्हणाले,
“मुंबईत जर बिहार भवन उभे राहू शकते,
तर महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्याचे बुलढाणा भवन का उभे राहू नये?
ते नक्कीच उभे राहिले पाहिजे.”
बुलढाणा जिल्ह्याशी असलेले भावनिक नाते व्यक्त करताना त्यांनी सांगितले की,
बाळासाहेब आंबेडकर अकोला लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत असताना
बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा व शेगाव तालुक्यातील
आंबेडकरी जनतेने आम्हाला भरभरून प्रेम दिले होते.
सेवानिवृत्त अधिकारी एच. बी. तायडे आपल्या भाषणात भावुक होत म्हणाले,
“डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनातील ही माती
बाबासाहेबांच्या पाऊलखुणांनी पावन झालेली आहे.
अशा पवित्र वास्तूत आमचा सन्मान होतोय,
हे आमचे भाग्य आहे.”
या कार्यक्रमात विविध विभागांतून सेवानिवृत्त झालेल्या
ज्येष्ठ अधिकारी वर्गाचा जीवनगौरव पुरस्कार देऊन
मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
हा सन्मान म्हणजे कृतज्ञतेची भावना,
अनुभवाचा गौरव
आणि पुढील पिढीसाठी प्रेरणा देणारा ठरला.
विशेष म्हणजे या वेळी 105 वर्षांच्या जयवंताबाई अंभोरे या माउलींचा
जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना
“प्रबुद्ध भारत” हे वृत्तपत्र चालवण्यासाठी
त्यांनी दिलेल्या १ रुपयाच्या वर्गणीची आठवण
या प्रसंगी उपस्थितांना भावूक करून गेली.
या वार्षिक स्नेहसंमेलनाचे सूत्रसंचालन
सहसचिव वामन मोरे सर व खरात सर यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी
भास्कर पवार, विजय खरात, सीमा जाधव,
राजेंद्र जाधव, ललिताबाई पंडागळे
यांच्या सह सर्व सदस्यांनी मेहनत घेतली.
बुलढाणा जिल्ह्यातील मुंबईत वास्तव्यास असलेल्या
अनेक कुटुंबांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून
संघटनाची ताकद दाखवून दिली.
बुलढाणा भवन म्हणजे केवळ एक इमारत नसून,
ती बुलढाणा जिल्ह्याच्या अस्मितेचे,
एकतेचे आणि बाबासाहेबांच्या विचारांचे प्रतीक ठरणार आहे.
हे स्नेहसंमेलन म्हणजे
बाबासाहेबांच्या विचारांचा जागर
आणि भविष्यातील बुलढाणा भवनाचा
ऐतिहासिक पाया ठरल्याचे स्पष्ट झाले.
आपले मत काय? बुलढाणा भवन उभारणीबाबत आपली प्रतिक्रिया कळवा.













