वाशिम| १८ जानेवारी २०२६
दि. १४.०१.२०२६ रोजी गोगरी (ता. मंगरुळपीर) येथील शेतकरी श्री. ऋषिकेश पवार “मनरेगा” योजनेंतर्गत फळबाग लागवडीच्या थकीत अनुदानाबाबत विचारणा करण्यासाठी गेले असता, तालुका कृषी अधिकारी श्री. सचिन कांबळे यांनी त्यांच्याशी अर्वाच्य भाषेत संवाद साधून बुटाने मारहाण केली आणि धमकावले, असे प्राथमिक पुराव्यांवरून दिसून आले आहे.
कट्टा न्यूजने या घटनेचा संपूर्ण खुलासा करून मुद्दा मांडला आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांना प्रशासनापर्यंत पोहोचवले. या वृत्त आणि सोशल मिडिया व्हिडिओवरून प्राथमिक माहिती मिळाल्यानंतर, प्रशासनाने तात्काळ कारवाई करत अधिकारी श्री. कांबळे यांना निलंबित केले आहे.
सदर अधिकाऱ्याचे वर्तन शासकीय शिस्तीला धरून नाही, तसेच हे लोकसेवकांच्या आचारसंहितेचे उल्लंघन आहे. अशा प्रकारचे अशोभनीय वर्तन एका जबाबदार पदावर कार्यरत अधिकाऱ्याकडून होणे प्रशासकीय दृष्टिकोनातून स्वीकारार्ह नाही. या घटनेमुळे विभागाच्या प्रतिमेवर प्रतिकूल परिणाम झाला असून जनमानसात चुकीचा संदेश गेला आहे.
महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, १९७९ च्या नियम ३ च्या तरतूदींनुसार, श्री. सचिन भास्कर कांबळे यांचे वर्तन शिस्तभंगविषयक आहे. त्याचबाबत महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ च्या नियम ४(१)(अ) अन्वये आयुक्त (कृषि) यांनी शासनास निलंबनाची शिफारस केली. शासनाने त्याअन्वये अधिकारी तात्काळ निलंबित केले आहे.
हे पण वाचा..
रिसोड तालुक्यात मनरेगा घोटाळ्याचा भांडाफोड! आधीच पूर्ण विहीर, तरी २५ हजारांची लाच घेऊन बनावट मस्टर
निलंबन कालावधीत श्री. कांबळे यांचे मुख्यालय जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, वाशिम येथे राहील आणि त्यांच्या पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नाही. याच कालावधीत त्यांच्या निर्वाहभत्तेचे प्रश्न आणि अन्य नियमित अधिकार तसेच पालन केले जातील.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी कट्टा न्यूजच्या सतत प्रयत्नांमुळे प्रशासन कारवाईस तयार झाले आणि अधिकारी तात्काळ निलंबित करण्यात आले, हे प्रशासनाच्या कार्यक्षमतेसाठी आणि जनतेच्या विश्वासासाठी महत्त्वपूर्ण ठरले आहे.













