नारायणराव आरु पाटील/वाशिम जिल्हा प्रतिनिधी
कारंजा (वाशीम) : कारंजा शहरातील मंगरुळ वेस व दारव्हा वेश येथे प्रवासी निवारा नसल्याने प्रवाशांची मोठी कोंडी होत आहे. दररोज यवतमाळ, दारव्हा तसेच इतर ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांना रस्त्यावर उभे राहून बसची वाट पाहावी लागत असल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.
पावसाळा असो वा कडक उन्हाळा, प्रवाशांना थांबण्यासाठी कोणतीही सुरक्षित व्यवस्था नसल्यामुळे परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत असून अनेक वेळा असुरक्षिततेची भावना निर्माण होत आहे.
मंगरुळ वेस व दारव्हा वेश या दोन्ही परिसरात प्रवासी व नागरिकांची मोठी गर्दी असते. या ठिकाणी दुचाकी आणि चारचाकी वाहनांची सतत वर्दळ असल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. प्रवासी रस्त्यावर उभे राहत असल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो आणि अपघाताचा धोका अधिक वाढतो.
कारंजा-मानोरा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्रीमती सईताई डहाके यांनी या गंभीर समस्येकडे लक्ष देऊन पुढाकार घ्यावा, अशी जोरदार मागणी प्रवाशांकडून होत आहे. आमदार निधीतून मंगरुळ वेस व दारव्हा वेश येथे प्रवासी निवारे बांधून देण्यात यावेत, अशी स्पष्ट मागणी करण्यात आली आहे.
या संदर्भात अभिजीत गोपाळराव खोपे, बबनराव भागवत, प्रमोद गुल्हाने, राहुल देशमुख, अतुल खोपे, सुधीर भगवान, अनिल लावरवार, मिलिंद टोंग, नामदेव मोखाडे, अमित वैद्य, प्रवीण परसवार यांच्यासह अनेक नागरिकांनी आमदारांकडे निवेदन सादर केले आहे.
प्रवासी निवारे उभारण्यात आल्यास प्रवाशांना सुरक्षिततेचा दिलासा मिळेल, महिलांची गैरसोय दूर होईल तसेच वाहतूक सुरळीत होऊन अपघातांचे प्रमाण कमी होईल, असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला आहे. प्रशासनाने या मागणीची दखल घ्यावी, अशी अपेक्षा कारंजा शहरातील प्रवासी व्यक्त करत आहेत.
📢 तुमच्या परिसरातील समस्या आम्हाला कळवा. Kattanews.in तुमचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवेल.
🔗 हे पण वाचा..
भूमिपुत्र शेतकरी संघटनेचा ७ वा वर्धापन दिन रिसोडमध्ये उत्साहात साजरा.
वाशिमचा ‘किन्हीराजा’ ठरणार आदर्श दत्तकगाव! जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकरांचा सर्वांगीण विकासाचा मास्टरप्लॅन.
अधिकारी सद्बुद्धीसाठी 101 नारळ! वाशिम पंचायत समितीसमोर शेतकऱ्यांचे अनोखे आंदोलन.










