निमित्त होतं लोकशिक्षण संस्थेचे सचिव आणि जिजामाता ग्रीन एनर्जी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष, भाजपचे ज्येष्ठ नेते गणेशराव राजे जाधव यांच्या वाढदिवसाचं. या कार्यक्रमात आयोजित जाहीर व्याख्यानाला परिसरातील शेतकरी, युवक आणि नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार तोताराम कायंदे होते, तर माजी खासदार सुखदेव काळे, लोकशिक्षण संस्थेचे अध्यक्ष मुकुंदराव देशमुख, ह.भ.प. काळे महाराज, ह.भ.प. काशिनाथ महाराज हरकळ, डॉ. शिवाजी खरात यांच्यासह अनेक मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
पंजाब डख यांनी व्याख्यानात २०२६ ते २०५० या कालावधीत पावसाचे बदलते स्वरूप, जलव्यवस्थापनाची गरज आणि दीर्घकालीन पीकपद्धतीबाबत सविस्तर मांडणी केली. गावरान आंबा-लिंबोळीसारख्या पारंपरिक निसर्गसंकेतांमागचं वैज्ञानिक तर्कशास्त्रही त्यांनी उलगडलं, तसंच गारपीट व अवकाळी पावसाचा शेतीवर होणारा परिणामही स्पष्ट केला.
कापूस व अन्य शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याची खंत व्यक्त करत डख म्हणाले, “जोपर्यंत शेतकरी संघटित होत नाही, तोपर्यंत त्याला न्याय्य भाव आणि सन्मान मिळणे कठीण आहे.” शेतकऱ्यांनी एकजुटीने उभं राहण्याचं आवाहनही त्यांनी यावेळी केलं.
प्रास्ताविकात ज्ञानेश राजे जाधव यांनी गणेशराव राजे जाधव यांच्या सामाजिक, राजकीय आणि सहकार क्षेत्रातील कार्याचा आढावा घेतला. उत्तरादाखल बोलताना गणेशराव राजे जाधव यांनी जिजामाता ग्रीन एनर्जी साखर कारखान्याच्या माध्यमातून ऊस उत्पादकांना आर्थिक बळ देण्याची आणि सहकार चळवळ बळकट करण्याची ग्वाही दिली.
कार्यक्रमाला शेतकरी योद्धा कृती समितीचे संस्थापक अध्यक्ष बाळाजी सोसे, विविध शेतकरी संघटनांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार ऋषिकेश देशमुख यांनी मानले.










