मोताळा,प्रतिनिधी | प्रविण गरुडे
मोताळा तालुक्यात अवकाळी पावसाने पुन्हा एकदा शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. तपोवन, काळेगाव, सारोळा मारोती आणि सारोळा पीर परिसरातील सोयाबीन, कापूस, मका, भाजीपाला तसेच इतर हंगामी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून अनेक ठिकाणी पिके आडवी पडली आहेत. काही शेतकऱ्यांच्या घरांचे, गोठ्यांचे आणि शेतीपयोगी साहित्याचेही नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.
या पार्श्वभूमीवर आमदार धर्मवीर संजू गायकवाड यांनी नुकसानग्रस्त गावांना भेट देत शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधला. त्यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेत नुकसानाची पाहणी केली. “कोणताही नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये,” असे स्पष्ट निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले.
यावेळी तहसीलदार सौ. सारिका, मंडळ अधिकारी, तलाठी, कृषी सहाय्यक, गटविकास अधिकारी, ग्रामसेवक तसेच संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना तातडीने पारदर्शक पंचनामे करून अहवाल शासनाकडे पाठविण्याच्या सूचना देण्यात आल्या. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर आर्थिक मदत मिळावी, यासाठी प्रशासनाने विलंब न करता कार्यवाही करावी, असेही आमदार गायकवाड यांनी सांगितले.
या पाहणी दौऱ्यात शिवसेना व युवासेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
👉 Kattanews.in वाचा – आपल्या परिसरातील ताज्या, विश्वासार्ह आणि सर्वात वेगवान बातम्यांसाठी आमच्यासोबत जोडलेले रहा.
Related News










