हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

साखरखेर्डा परिसरात भीषण जलसंकट; सर्व तलाव कोरडे, मुक्या जनावरांना पाण्यासाठी वणवण, 15 गावांवर टंचाईचे सावट

On: June 16, 2026 7:40 AM
Follow Us:
सावंगी माळी येथील कोरडा पडलेला तलाव, साखरखेर्डा परिसरातील भीषण पाणीटंचाईचे दृश्य

साखरखेर्डा |समाधान सरकटे 

बुलढाणा जिल्ह्यातील साखरखेर्डा परिसरात यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीलाच भीषण जलसंकट निर्माण झाले आहे. सावंगी माळी एक व दोन प्रकल्पांसह अनेक लघू व मध्यम तलाव पूर्णपणे कोरडे पडले असून उर्वरित तलावांमधील पाणीसाठा मृतसाठ्यावर पोहोचला आहे. परिणामी परिसरातील 15 हून अधिक गावांवर पिण्याच्या पाण्याची गंभीर टंचाई निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मुक्या जनावरांनाही पाण्यासाठी वणवण भटकावे लागत असल्याने शेतकरी व ग्रामस्थांमध्ये तीव्र चिंता व्यक्त होत आहे.

परिसरातील महालक्ष्मी तलावामध्ये सध्या अत्यल्प पाणीसाठा उपलब्ध आहे. या तलावातून साखरखेर्डा आणि सावंगी भगत गावांना पाणीपुरवठा केला जातो. साखरखेर्डा ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. ज्योती अमित जाधव यांनी वेळेत कोराडी प्रकल्पावरून पाणीपुरवठा योजना सुरू करून ग्रामस्थांना काहीसा दिलासा दिला असला, तरी सावंगी भगत गावासमोर गंभीर पाणीटंचाईचे संकट उभे राहिले आहे.

गायखेडी तलावावर अवलंबून असलेल्या राताळी आणि शिंदी गावांमध्येही परिस्थिती चिंताजनक बनली आहे. पाणीपुरवठा विहिरींमधील जलपातळी मोठ्या प्रमाणात घटल्याने दोन्ही गावांना आवश्यक प्रमाणात पाणी मिळत नसल्याची माहिती समोर आली आहे. येत्या काही दिवसांत या गावांमध्येही टंचाई अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

👉 विशेष जाहिरात | अधिक माहितीसाठी क्लिक करा

Advertisement

सावंगी माळी एक आणि दोन हे परिसरातील महत्त्वाचे तलाव मे महिन्यातच पूर्णपणे कोरडे पडले. या तलावांमधून उमनगाव, पांग्रीकाटे, वडगाव माळी, सावंगी माळी आणि सावंगी वीर या गावांना पाणीपुरवठा केला जातो. मात्र तलावातील विहिरींनी तळ गाठल्याने या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्याचबरोबर गुरेढोरे आणि जंगली प्राण्यांसाठीही पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

राजेगाव तलावात सध्या केवळ मृतसाठा शिल्लक असून शेंदुर्जन, राजेगाव, लिंगा, सायाळा, बाळसमुद्र, गोरेगाव आणि जागदरी या गावांच्या पाणीपुरवठा योजना त्यावर अवलंबून आहेत. पाणीसाठा झपाट्याने कमी होत असल्याने या गावांनाही भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो. दरम्यान, परिसरातील अनेक लहान पाझर तलाव यापूर्वीच पूर्णपणे कोरडे पडले आहेत.

शेतकरी आणि ग्रामस्थांनी महालक्ष्मी, गायखेडी, राजेगाव आणि सावंगी माळी तलावांमध्ये उरलेले पाणी तातडीने राखीव ठेवण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे. आगामी काळात पावसाला विलंब झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की, जलसंकटाची तीव्रता लक्षात घेऊन प्रशासनाने वेळेत उपाययोजना करणे आवश्यक आहे. अन्यथा ग्रामीण भागातील नागरिकांसह हजारो मुक्या जनावरांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो.


📢 वाचकांसाठी आवाहन

आपल्या परिसरातील महत्त्वाच्या घडामोडी, समस्या, अपघात, सामाजिक उपक्रम किंवा ताज्या बातम्या आम्हाला पाठवा. आपली बातमी KattaNews.in वर प्रसिद्ध केली जाईल.


संबंधित बातम्या

 

समाधान सरकटे

समाधान सरकटे हे सिंदखेडराजा येथील प्रतिनिधी असून महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील सामाजिक, कृषी, प्रशासनिक व विकासात्मक घडामोडींचे राज्यस्तरावर वार्तांकन करतात. त्यांना ७ वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव असून शेतकरी प्रश्न, ग्रामपंचायत, ग्रामीण विकास योजना व स्थानिक प्रशासनाशी संबंधित बातम्यांवर त्यांचा विशेष भर आहे. ग्रामीण वास्तव अचूकपणे मांडणाऱ्या त्यांच्या बातम्यांना वाचकांचा मोठा विश्वास आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment