लोणार |विनायक कुटे
एका क्षणात सर्व काही संपलं… मध्यरात्री लागलेल्या भीषण आगीने वढव गावातील अनेक कुटुंबांचे आयुष्य उद्ध्वस्त केलं. २८ एप्रिलच्या रात्री अचानक लागलेल्या आगीने ६ ते ७ शेतकऱ्यांची घरे काही क्षणांतच ज्वाळांमध्ये भस्मसात झाली. आयुष्यभराची मेहनत, साठवलेला शेतीमाल, घरातील संसारोपयोगी वस्तू—सगळं काही राख झालं. आज ही कुटुंबं उघड्यावर आली असून त्यांच्या डोळ्यांत फक्त अश्रू आणि मदतीची आस आहे.
ही आग इतकी भीषण होती की संपूर्ण गाव हादरून गेले. ग्रामस्थांनी जीवाच्या आकांताने आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र ज्वाळांनी सर्वकाही गिळंकृत केलं. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, पण आर्थिक नुकसान प्रचंड झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच आमदार सिद्धार्थ खरात आणि मेहकर नगराध्यक्ष किशोर गारोळे हे रात्री दीड वाजता घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तात्काळ परिस्थितीचा आढावा घेत मेहकर आणि लोणार येथून अग्निशमन दलाच्या गाड्या मागवून घेतल्या. तब्बल चार वाजेपर्यंत आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.
या वेळी तहसीलदार भूषण पाटील, अॅड. आकाश घोडे यांच्यासह प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते. प्रशासनाला तातडीने मदतकार्य सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून नुकसानग्रस्त कुटुंबांना त्वरित मदत व भरपाई देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
या कठीण प्रसंगी संपूर्ण गाव एकत्र येत असून, नागरिकांनी मदतीचा हात पुढे करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. आमदार सिद्धार्थ खरात यांनी स्पष्ट सांगितले की, “या कुटुंबांना योग्य मदत मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”
👉 ही बातमी जास्तीत जास्त शेअर करा आणि पीडित कुटुंबांपर्यंत मदतीचा हात पोहोचवा.










