बुलढाणा | २२ जानेवारी २०२६
बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यातील राहेरी बुद्रुक येथील शेतकरी अतिवृष्टी मदतीपासून वंचित असल्याची गंभीर बाब समोर आली आहे.
२०२५ च्या ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात झालेल्या सततच्या पावसामुळे व काही ठिकाणी झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.
या पार्श्वभूमीवर शासनाने अतिवृष्टी नुकसान भरपाई व रब्बी पेरणीसाठी आर्थिक मदत जाहीर केली होती.
सिंदखेडराजा तालुक्यातील अनेक गावांतील शेतकऱ्यांना ही मदत मिळालेली असताना,
राहेरी बु. येथील काही शेतकरी मात्र आजतागायत कोणत्याही प्रकारच्या आर्थिक मदतीपासून वंचित आहेत.
संबंधित कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळेच ही मदत अडकल्याचा आरोप येथील शेतकऱ्यांनी केला आहे.
महाराष्ट्र शासनाने ही मदत दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाईल,
असे जाहीरपणे सांगितले होते, जेणेकरून शेतकऱ्यांना सण साजरा करता येईल.
मात्र दिवाळी उलटून अनेक महिने झाले तरीही राहेरी बुद्रुक येथील काही शेतकऱ्यांना एक रुपयाचीही मदत मिळालेली नाही.
या संदर्भात शेतकऱ्यांनी वेळोवेळी निवेदने देऊनही कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने
आज १९ जानेवारी रोजी शेतकऱ्यांच्या सह्यांसह तहसीलदार, सिंदखेडराजा यांना पुन्हा एकदा निवेदन देण्यात आले आहे.
या निवेदनावर पंढरी देशमुख, आनंद देशमुख, विठ्ठल देशमुख, धनंजय देशमुख, मिलिंद गवई, भगवान देशमुख,
सुभाषराव देशमुख, उल्हास देशमुख, मनोहर देशमुख, दिलीप देशमुख, संकेत इंगळे,
श्रीराम सरकटे, पवन सरकटे, आबासाहेब सरकटे आदी शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.
निवेदनात अतिवृष्टीची आर्थिक मदत तसेच रब्बी पेरणीसाठी जाहीर केलेली मदत तातडीने वितरित करावी,
अन्यथा आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.
या संदर्भात प्रतिक्रिया देताना भाजपा तालुकाध्यक्ष आनंद देशमुख यांनी सांगितले की,
२०२५ मध्ये झालेल्या सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे संपूर्ण नुकसान झाले असून,
काही शेतकऱ्यांना मदत मिळाली तर काहींना आजपर्यंत एक रुपयाचीही मदत मिळालेली नाही.
आठ दिवसांच्या आत उर्वरित शेतकऱ्यांचे पैसे मिळाले नाहीत तर तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल.
ग्रामीण, शेतकरी, राजकीय व सामाजिक विषयांवरील वास्तवदर्शी आणि प्रभावी बातम्यांसाठी
Kattanews.in वाचा आणि शेतकऱ्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी ही बातमी शेअर करा.











