बुलढाणा | १७ जानेवारी २०२६
नामांतर लढ्यातील शौर्यस्तंभाचे काम येत्या ६ महिन्यांत पूर्ण केले जाईल, अशी ठाम घोषणा
पीपल्स रिपब्लिक पार्टीचे युवा नेते जयदीप कवाडे यांनी सिंदखेडराजा तालुक्यातील
राहेरी बु.–दुसरबीड येथील संघर्षभूमीवर केली.
नामांतर लढ्यातील शौर्यस्तंभ हा दलित व बहुजन समाजाच्या शौर्य, आत्मसन्मान आणि स्वाभिमानाचे प्रतीक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यासाठी झालेल्या ऐतिहासिक
नामांतर लढ्याच्या स्मृती जतन करण्यासाठी दरवर्षी १५ जानेवारी रोजी येथे स्मृती सोहळा आयोजित केला जातो.
या संघर्षभूमीवर नतमस्तक झाल्यानंतर संघर्ष करण्याची नवी ऊर्जा मिळते, असे भावनिक उद्गार
जयदीप कवाडे यांनी उपस्थितांसमोर व्यक्त केले.
याच मार्गाने नामांतरासाठीचा ऐतिहासिक लॉंगमार्च निघाला होता.
खडकपूर्णा नदीवरील पुलावर प्रशासनाने अमानुष लाठीचार्ज करून हा लढा थांबवण्याचा प्रयत्न केला होता.
या संघर्षात महाराष्ट्रभरातील अनेक भीमसैनिक शहीद झाले.
त्यांच्या स्मरणार्थ उभारण्यात येणारा शौर्यस्तंभ सहा महिन्यांत पूर्ण केला जाईल,
असे आश्वासन कवाडे यांनी दिले.
पुढे बोलताना कवाडे म्हणाले की, नामांतराला काँग्रेसने विरोध केला होता.
खैरलांजी प्रकरण काँग्रेसच्या काळातच घडले.
त्या वेळी आमदार असलेल्या प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी
भोतमांगे कुटुंबाला न्याय न मिळाल्याने आपल्या पदाचा राजीनामा दिला,
हे आंबेडकरी चळवळीतील आदर्श उदाहरण आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळेच एक सामान्य माणूस देशाचा पंतप्रधान होऊ शकतो,
असे सांगत कवाडे यांनी आंबेडकरी चळवळीशी शेवटच्या श्वासापर्यंत निष्ठा राखण्याची भावनिक साद घातली.
या वेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) चे जिल्हाध्यक्ष भाई दिलीप खरात,
लोक जागरचे प्रवीण गीते, तसेच चरणदास इंगोले, डॉ. ज्ञानेश्वर नागरे यांची भाषणे झाली.
अनेक मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी नामांतर लढ्यात शहीद झालेल्या भीमसैनिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
कार्यक्रमाचे संचालन साहित्यिक अजीम नवाज राही यांनी केले, तर आभार प्रदर्शन भिकाजी इंगळे यांनी केले.
🔗 हे पण वाचा.










