शेंदुर्जन |राहुल साबळे
एकदा चोरी झाल्यानंतर कुटुंब सावरत असतानाच अवघ्या चार दिवसांनी त्याच घराला पुन्हा चोरट्यांनी लक्ष्य केल्याची धक्कादायक घटना शेंदुर्जन येथे समोर आली आहे. वैभव भास्कर देशमुख यांच्या मुख्य रस्त्यालगत असलेल्या घरात चोरट्यांनी सलग दोनदा चोरी केली. पहिल्या घटनेत सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लंपास करण्यात आली, तर दुसऱ्या वेळी घरातील मौल्यवान साड्यांवर डल्ला मारण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, पहिली चोरी शुक्रवार, ७ ऑगस्ट रोजी दुपारी २ ते ३ वाजेच्या सुमारास झाली. वैभव देशमुख यांच्या आई काही कामानिमित्त बाहेरगावी गेल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला.
यावेळी चोरट्यांनी पूजेच्या डब्यात ठेवलेली सुमारे १० हजार रुपयांची रोख रक्कम तसेच अंदाजे १० ग्रॅम वजनाची, ८० गहू मणी असलेली सोन्याची पोथ लंपास केली.
पहिल्या चोरीची घटना समोर आल्यानंतर कुटुंबीयांनी याबाबत साखरखेर्डा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. मात्र, या घटनेला अवघे चार दिवस होत नाहीत तोच चोरट्यांनी पुन्हा त्याच घराला लक्ष्य केले.
मंगळवार, ११ ऑगस्ट रोजी रात्री १२ ते १ वाजेच्या सुमारास दुसरी चोरी झाल्याचे सांगण्यात आले आहे. यावेळी चोरट्यांनी घरातून अंदाजे १५ ते २० हजार रुपये किमतीच्या मौल्यवान साड्या चोरून नेल्या.
एकाच घरात अवघ्या चार दिवसांच्या अंतराने दोनदा चोरी झाल्याने देशमुख कुटुंबासह शेंदुर्जन परिसरातील नागरिकांमध्येही चिंता आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मुख्य रस्त्यालगत असलेल्या घराला पुन्हा लक्ष्य करण्यात आल्याने या प्रकाराची गांभीर्याने दखल घेण्याची मागणी होत आहे.
या दोन्ही घटनांचा सखोल तपास करून चोरट्यांचा तातडीने शोध घ्यावा, त्यांना अटक करावी आणि चोरीला गेलेले सोन्याचे दागिने, रोख रक्कम तसेच साड्या जप्त कराव्यात, अशी मागणी वैभव देशमुख यांनी केली आहे.
📲 KattaNews WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी व्हा
महाराष्ट्रातील ताज्या स्थानिक आणि महत्त्वाच्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी व्हा.










