साखरखेर्डा | प्रतिनिधी : समाधान सरकटे
मेहकर तालुक्यातील पेनटाकळी धरणात ३५ वर्षीय तरुणाने उडी घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना ११ ऑगस्ट रोजी रात्री घडली. विष्णू तेजराव राजेकर असे मृत तरुणाचे नाव असून, या घटनेमुळे पेनटाकळी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विष्णू राजेकर हे पेनटाकळी येथील रहिवासी होते. फाट्यावर त्यांचे हेअर सलूनचे दुकान होते. त्यांच्या पश्चात पत्नी, सहा वर्षांची मुलगी आणि तीन वर्षांचा मुलगा असा परिवार आहे.
११ ऑगस्ट रोजी रात्री सुमारे ८ वाजता विष्णू राजेकर हे पत्नी आणि मुलांना काहीही न सांगता घरातून बाहेर पडले. त्यानंतर ते पेनटाकळी धरणाच्या दिशेने गेले.
धरणावर वॉचमन म्हणून ड्युटीवर असलेल्या वानखेडे यांच्या समोरच विष्णू यांनी धरणात उडी घेतली. ही घटना समोर आल्यानंतर त्याची माहिती पेनटाकळी गावात वाऱ्यासारखी पसरली. विष्णू यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.
दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर १२ ऑगस्ट रोजी सकाळी सुमारे ९ वाजता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथक पेनटाकळी धरणावर दाखल झाले. पथकाने शोधमोहीम राबवत विष्णू राजेकर यांचा मृतदेह धरणातून बाहेर काढला.
या घटनेची तक्रार मृतकाचा चुलत भाऊ गजानन राजेकर यांनी साखरखेर्डा पोलीस ठाण्यात दिली. त्यानंतर दुय्यम ठाणेदार संदीप मेंधणे, लक्ष्मण इनामे, सुजित मेहर आणि योगेश जवजांळ यांनी घटनास्थळी पंचांच्या उपस्थितीत पंचनामा केला. याप्रकरणी मर्ग दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास ठाणेदार युवराज रबडे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार कडूबा डोईफोडे करीत आहेत. आत्महत्येचे नेमके कारण काय, याचा तपास पोलीस करीत आहेत.
विष्णू राजेकर यांच्या अचानक झालेल्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबीयांवर मोठे संकट कोसळले आहे. दोन चिमुकल्या मुलांच्या डोक्यावरून वडिलांचे छत्र हरपल्याने पेनटाकळी गावात हळहळ व्यक्त होत आहे.
📲 KattaNews च्या WhatsApp ग्रुपमध्ये सामील व्हा
महाराष्ट्रातील ताज्या स्थानिक बातम्या आणि महत्त्वाचे अपडेट्स थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी व्हा.










