मेरा बु. | २९ जानेवारी २०२६
सततची नापिकी, वाढते कर्ज आणि पिकाच्या नुकसानीमुळे ३२ वर्षीय तरुण शेतकरी पुत्राने शेतात विष प्राशन करून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना २८ जानेवारी रोजी अंढेरा पोस्टे अंतर्गत येणाऱ्या मनुबाई येथे घडली.
यावर्षी शेतात सोयाबीनची पेरणी करण्यात आली होती. मात्र हुमणी अळीच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण सोयाबीन पीक उद्ध्वस्त झाले. त्यामुळे बँकेच्या कर्जाची परतफेड करणे कुटुंबाला शक्य झाले नाही.
वडिलांवर वाढलेल्या कर्जामुळे आणि घरातील आर्थिक परिस्थितीमुळे शंकर वायाळ यांचा लहान मुलगा नितीन शंकर वायाळ (वय ३२) हा तीव्र नैराश्यात होता. अखेर त्याने शेतात विष प्राशन करून जीवनयात्रा संपवली.
या घटनेची माहिती मिळताच अंढेरा पोलीस ठाण्याचे ठाणेदार रुपेश शक्करगे यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमादार पोफळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून मर्ग दाखल करण्यात आला आहे.
या घटनेमुळे मनुबाईसह संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत पुन्हा एकदा गंभीर चर्चा सुरू झाली आहे.
शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात. आपले मत आम्हाला कमेंटद्वारे कळवा आणि ही बातमी जास्तीत जास्त शेअर करा.










