जळगाव जामोद/प्रतिनिधी
दिवाळीच्या प्रकाशात आनंद साजरा करत असतानाच बुलढाणा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. फटाके फोडण्याच्या क्षुल्लक वादातून एका तरुणाचा जीव गेला. ऐन लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घडलेल्या या घटनेने जिल्हाभरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
२०२५दिवाळीच्या आनंदात संपूर्ण शहर उजळलेलं असतानाच बुलढाणा जिल्ह्यात एक दुर्दैवी घटना घडली आहे. फटाके फोडण्याच्या किरकोळ वादावरून २६ वर्षीय तरुणाचा खून झाल्याने जिल्हाभरात खळबळ माजली आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच घडलेली ही घटना सर्वत्र चर्चेचा विषय ठरली असून नागरिकांत हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांनी या प्रकरणी तिघा तरुणांना अटक केली आहे.
छोटासा वाद झाला जीवघेणा
२१ ऑक्टोबरच्या रात्री सुमारे साडेआठ वाजता जळगाव जामोद तालुक्यातील अयोध्यानगर परिसरात ही घटना घडली. अमोल हिरामण हिस्सल (वय २६) आणि त्याचा भाऊ विनय हिस्सल हे घरासमोर उभे होते. तेव्हाच योगेश रामदास ताडे (वय २२), शुभम रमेश ताडे (वय २७) आणि ज्ञानेश्वर पंडित कोथळकर (वय २७) हे तिघे तरुण फटाके फोडत होते.
फटाके अमोलच्या अंगावर गेल्याने त्याने नाराजी व्यक्त केली. त्यावरून छोटासा वाद निर्माण झाला, पण काही क्षणांतच हा वाद तीव्र बनला आणि हाणामारीत परिवर्तित झाला.वाद वाढताच योगेश ताडे याने अमोलचे डोके पकडून त्याला घरासमोरील ओट्यावर आपटले.
तर शुभम ताडे आणि ज्ञानेश्वर कोथळकर यांनी लाथाबुक्क्यांनी अमोलला छातीवर, पाठीवर आणि डोक्यावर जबर मारहाण केली. याचवेळी योगेश ताडेने खिशातील पेचकस काढून अमोलच्या कपाळावर वार केला. या मारहाणीमध्ये अमोल गंभीर जखमी झाला आणि काही वेळातच त्याचा मृत्यू झाला.
🚨पोलिसांची तात्काळ कारवाई
या घटनेनंतर मृतकाचा भाऊ विनय हिस्सल यांनी जळगाव जामोद पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली. पोलिसांनी तत्काळ तपास सुरू करत आरोपी योगेश रामदास ताडे, शुभम रमेश ताडे आणि ज्ञानेश्वर पंडित कोथळकर या तिघांना अटक केली.
या प्रकरणात गुन्हा क्रमांक ४९०/२०२५ अंतर्गत कलम 103(1), 3(5) भारतीय न्यायसंहितेनुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक नारायण सरकटे हे पोलीस निरीक्षक श्रीकांत निचळ यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत.
लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच दुर्दैव
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी झालेल्या या घटनेने जिल्हाभरात दु:खाचे वातावरण निर्माण झाले आहे. दिवाळीच्या उत्साहात एका कुटुंबावर शोककळा ओढवल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. समाजातील तरुण पिढीने संयम राखावा, किरकोळ कारणावरून जीवघेण्या घटनांकडे जाणं टाळावं, अशी प्रतिक्रिया अनेक नागरिकांनी दिली आहे.
घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी सांगितलं की, दिवाळीच्या दिवशी अशा घटनांनी समाजाला काळजी वाटते. आनंदाचा सण असूनही काही क्षणांच्या आवेशामुळे जीव गमवावा लागणं ही शोकांतिका आहे. पोलिसांनी आरोपींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.














