भोकरदन |२७ जानेवारी २०२६
भोकरदन शहरात शालेय मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, काही दिवसांपूर्वी शालेय विद्यार्थिनीची छेडछाड झाल्याची घटना समोर आल्यानंतर शहरात दामिनी पथक तात्काळ दाखल झाले आहे. बसस्थानक परिसरात पोलीस चौकी स्थापन करण्याची ठाम मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या नेत्या अनिताताई जाधव यांनी केली आहे.
या घटनेबाबत कट्टा न्यूज मराठी सह विविध वर्तमानपत्रांत बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल व अतिरिक्त पोलीस अधीक्षक नोपाणी यांनी तात्काळ दखल घेत दामिनी पथक भोकरदन शहरात पाठवले.
पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार गुरुवारी (दि.२२) जालना येथील दामिनी पथक भोकरदनमध्ये दाखल झाले. पथकाने तक्रारदार सौ. अनिताताई जाधव यांच्यासह न्यू हायस्कूल भोकरदन येथे भेट देत विद्यार्थिनींची बैठक घेऊन समुपदेशन केले. टवाळखोर मुलांवर कठोर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा यावेळी देण्यात आला.
यावेळी दामिनी पथकातील सौ. शेंदूरकर मॅडम, ज्योती राठोड, शारदा गायकवाड यांच्यासह शाळेचे मुख्याध्यापक बी. बी. नन्नावरे, शिक्षकवृंद उपस्थित होते.
दरम्यान, अनिताताई जाधव यांनी भोकरदन पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांची भेट घेऊन ग्रामीण भागातून शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थिनींच्या समस्यांवर सविस्तर चर्चा केली. बसस्थानक परिसरात पोलीस गस्त वाढवावी व कायमस्वरूपी पोलीस चौकी स्थापन करावी, अशी ठाम मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
शाळा व महाविद्यालय सुरू होण्याच्या व सुट्टीच्या वेळी विद्यार्थिनींचा पाठलाग करून छेडछाड करण्याच्या घटना वाढत असल्याने अनेक मुली मानसिक तणावात असून काहींनी शिक्षण सोडण्याचा विचार केल्याचेही शिक्षकांनी नमूद केले.
🔹 चौकट : मुख्याध्यापकांनी मानले आभार
मुख्याध्यापक श्री. नन्नावरे यांनी सांगितले की, अनिताताई जाधव यांनी आवाज उठवल्यामुळे दामिनी पथक शाळेत आले व विद्यार्थिनींना मोठा आधार मिळाला. याबद्दल त्यांनी दामिनी पथक व अनिताताई जाधव यांचे मनापासून आभार मानले.
📌 संबंधित बातम्या
- जालना शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मोठे आश्वासन
- भोकरदनमध्ये शिकणाऱ्या मुली असुरक्षित? रोड रोमियोचा पाठलाग, दामीनी पथक स्थापनेची जोरदार मागणी
- दामिनी पथकामुळे मुलींमध्ये आत्मविश्वास वाढला













