बुलढाणा |समाधान सरकटे
दुसरबीड शिवारातील शेतकऱ्याच्या गोठ्यातून रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत शेळ्या चोरून विक्रीसाठी निघालेल्या तिघा आरोपींना किनगाव राजा पोलिसांनी अवघ्या 12 तासांत अटक केली. या कारवाईत चोरीस गेलेल्या 7 शेळ्या, गुन्ह्यात वापरण्यात आलेली कार आणि तीन मोबाईल असा सुमारे 3 लाख 75 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांच्या या वेगवान कारवाईचे परिसरात कौतुक होत आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुसरबीड येथील शेतकरी भाग्यश्री संतोष खंदारे (वय 35) यांच्या मांडवा धरणाजवळील शेतातील गोठ्यातून 18 जुलैच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी लहान-मोठ्या शेळ्या व पिल्ले चोरून नेली होती. या चोरीमुळे शेतकरी कुटुंबाला मोठा आर्थिक फटका बसला.
घटनेनंतर भाग्यश्री खंदारे यांनी किनगाव राजा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून भारतीय न्याय संहिता कलम 303(2) अंतर्गत गुन्हा नोंदवून पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला.
तपासादरम्यान पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की चोरीच्या शेळ्या हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जवळा बाजार येथे विक्रीसाठी आणण्यात आल्या आहेत. या माहितीच्या आधारे पोलिसांचे पथक तात्काळ रवाना झाले.
कारवाईदरम्यान पोलिसांनी अजय सुभाष पवार (वय 19), कार्तिक सुभाष पवार (वय 20) आणि आदित्य सुभाष भोसले (वय 21) या तिघांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यांनी दुसरबीड शिवारातून शेळ्या चोरी करून विक्रीसाठी आणल्याची कबुली दिली.
या कारवाईत चोरीतील 7 शेळ्या, गुन्ह्यात वापरण्यात आलेली कार आणि तीन मोबाईल असा एकूण 3.75 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जप्त केलेल्या शेळ्या त्यांच्या मूळ मालक भाग्यश्री खंदारे यांच्या ताब्यात देण्यात आल्या.
ही कारवाई किनगाव राजा पोलीस ठाण्याचे ठाणेदार संजय मातोंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ. विष्णू मुंढे, पो.कॉ. गणेश वारकरी, पो.कॉ. विजेता पवार आणि पो.कॉ. प्रशांत जायभाये यांनी केली. पुढील तपास सुरू आहे.
महाराष्ट्रातील ताज्या, विश्वासार्ह आणि सर्वात वेगवान बातम्या मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुपमध्ये आजच सहभागी व्हा.










