बुलढाणा | १२ मार्च २०२६
बुलढाणा जिल्ह्यात अवघ्या 24 तासांच्या कालावधीत तब्बल सहा तरुण मुली बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 9 मार्च 2026 रोजी घडलेल्या या घटनांमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
जळगाव जामोद तालुक्यातील वडशिंगी येथील रेणुका ज्ञानेश्वर मिरगे (17 वर्ष 5 महिने) ही विद्यार्थिनी 9 मार्च रोजी दुपारी 2 वाजता ‘12 वीचा पेपर द्यायला जाते’ असे सांगून घरातून बाहेर पडली. मात्र ती परीक्षा केंद्रावर पोहोचलीच नाही. नातेवाईकांनी शोधाशोध केली असता ती सापडली नाही. या प्रकरणी अज्ञात इसमाविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम 137 (2) अंतर्गत अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संग्रामपूर तालुक्यातील वैष्णवी नारायण तायडे (वय 21) ही तरुणी 9 मार्चच्या मध्यरात्री बेपत्ता झाली. तिच्या काकांनी तामगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी मिसिंग नोंदवली आहे.
नांदुरा तहसील कार्यालयाजवळून प्रतिभा अनिल डाबेराव (वय 18 वर्ष 4 महिने) ही तरुणी 9 मार्च रोजी सकाळी 11.30 वाजता ‘ब्युटी पार्लरमध्ये जाते’ असे सांगून घरातून निघाली होती. त्यानंतर तिचा कोणताही पत्ता लागलेला नाही.
खामगाव तालुक्यातील वर्णा येथील दिव्या संजय निबोळकर (वय 19) ही तरुणी 10 मार्च रोजी सकाळी 11.30 वाजता ‘मामाच्या गावाला जाते’ असे सांगून घरातून बाहेर पडली. मात्र तीही घरी परतली नाही.
बुलढाणा शहरातील मिलिंदनगर येथील समीक्षा कैलास मिसाळ (वय 18) ही विद्यार्थिनी 9 मार्च रोजी दुपारी 1 वाजता शिवाजी हायस्कूल येथे 12 वीचा पेपर देण्यासाठी गेली होती. मात्र ती संध्याकाळपर्यंत घरी परतली नाही.
तसेच बुलढाणा तालुक्यातील येळगाव येथील शिवानी राजू कमळकर (वय 20) ही फार्मसीच्या दुसऱ्या वर्षात शिकणारी विद्यार्थिनी 9 मार्च रोजी कॉलेजला गेली होती. रात्री 8 वाजता तिने वडिलांना फोन करून ‘मी लग्न करते’ असे सांगून फोन कट केला. त्यानंतर तिचा संपर्क तुटला.
जिल्ह्यात एकाच दिवशी आणि अवघ्या 24 तासांच्या कालावधीत विविध भागांतून सहा तरुणी बेपत्ता झाल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. या वाढत्या घटनांमुळे जिल्ह्यात सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
दरम्यान, पोलिसांनी पालकांना आवाहन केले आहे की आपल्या मुलांशी सतत संवाद ठेवा आणि त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवावे.
Related News











