कट्टा न्यूज नेटवर्क/सिंदखेडराजा
दुसरबीड (ता. सिंदखेड राजा) : अतिवृष्टीने उद्ध्वस्त शेती, कर्जाचा डोंगर आणि वाढता मानसिक तणाव यामुळे सिंदखेड राजा तालुक्यातील दुसरबीड गावात शेतकरी आत्महत्येची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. अतिवृष्टीने उद्ध्वस्त शेतीमुळे दुसरबीडमध्ये शेतकऱ्याची आत्महत्या झाल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
साखरखेर्डा पोलीस ठाणे अंतर्गत मलकापूर पांग्रा शिवारात २९ डिसेंबर रोजी बाबुराव श्रीराम देशमुख (वय ६१) या शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. बाबुराव देशमुख हे सकाळी सुमारे ६ वाजताच्या सुमारास नेहमीप्रमाणे शेतातील मोटार सुरू करण्यासाठी गेले होते.
काही वेळानंतर ते शेतातील उंबराच्या झाडाला नायलॉन दोरीच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. ही बाब लक्षात येताच नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली व पोलिसांना माहिती दिली.
माहिती मिळताच साखरखेर्डा पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेण्यात आला. याप्रकरणी मर्ग क्रमांक ३७/२०२५ अन्वये कलम १९४ बीएनएसएस अंतर्गत नोंद करण्यात आली आहे.
मृतक बाबुराव देशमुख यांच्यावर बँकेचे तसेच खासगी कर्ज होते. यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतातील पीक पूर्णतः नष्ट झाल्याने ते गेल्या काही दिवसांपासून मानसिक तणावात होते, अशी माहिती फिर्यादी अमोल संजयराव देशमुख यांनी दिली आहे.
हे पण वाचा..
या मृत्यूबाबत कोणताही संशय व्यक्त करण्यात आलेला नाही. या प्रकरणाचा पुढील तपास साखरखेर्डा पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार निवृत्ती पोफेळ करीत आहेत. सिंदखेड राजा तालुक्यात अतिवृष्टीने उद्ध्वस्त शेती आणि कर्जबाजारीपणामुळे शेतकरी आत्महत्यांचे वाढते प्रमाण चिंतेचा विषय ठरत आहे.
👉 अशाच स्थानिक, सत्य आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी Kattanews.in ला Follow करा.
हे पण वाचा..












