शिवराज मांटे/प्रतिनिधी
अंढेरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मेरा खुर्द येथील रहिवासी गंगाराम हरीभाऊ उदार यांच्याकडे गट नंबर २२१ मध्ये कोरडवाहू शेती आहे. त्यांनी बँक ऑफ महाराष्ट्र, शाखा मेरा खुर्द येथून ३१ हजार रुपयांचे पीक कर्ज घेतले होते. तसेच त्यांचा मुलगा अनिल उदार यांनी बालाजी अर्बन पतसंस्था, चिखली येथून १ लाख ५० हजार रुपयांचे कर्ज घेतले होते.
यावर्षी पावसाच्या लहरीपणामुळे शेतातील उत्पन्न अपेक्षेप्रमाणे न झाल्याने कर्जबाजारी शेतकरी म्हणून अनिल उदार यांच्यावर मानसिक ताण वाढत गेला. कर्जाची परतफेड कशी करायची, कुटुंबाचा खर्च कसा भागवायचा या विवंचनेतून तो सतत नैराश्यात होता. घरातील सर्व सदस्य मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते.
या मानसिक तणावातूनच अनिल उदार यांनी १९ डिसेंबर रोजी सकाळी शेतात जात असल्याचे सांगून घर सोडले. शेतात गेल्यानंतर त्यांनी एका गोंधणीच्या झाडाला नायलॉन दोरीच्या साहाय्याने गळफास घेतला. काही वेळाने त्यांचा भाऊ संजय उदार शेतात पोहोचला असता दुरूनच भावाने गळफास घेतल्याचे दिसून आले. त्यांनी तात्काळ भावाला उचलण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत अनिल उदार यांचा मृत्यू झाला होता.
हे पण वाचा..
मलकापूरमध्ये भीषण अपघात! चारचाकी झाडावर आदळली, ३ युवक ठार; २ गंभीर जखमी.
या घटनेची माहिती सरपंच रमेश अवचार, पोलीस पाटील संजय ठाकूर यांना देण्यात आली. त्यांनी त्वरित अंढेरा पोलीस ठाण्याचे ठाणेदार रुपेश शक्करगे यांना कळवले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून मर्ग दाखल केला आहे.
या दुर्दैवी घटनेमुळे अनिल उदार हे घरातील कर्ते पुरुष गेल्याने आई-वडील, पत्नी, दोन लहान मुले व भाऊ यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शेतकरी आत्महत्या बुलढाणा जिल्ह्यात वाढत चालल्याने प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
📢 वाचा आणि शेअर करा
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवण्यासाठी ही बातमी जास्तीत जास्त शेअर करा.
🔗 हे पण वाचा..













