सिंदखेड राजा | १६ मार्च २०२६
शेतीसाठी पाणी मिळावे या मागणीसाठी आमरण उपोषण करून अखेर बलिदान देणारे शिवनी आरमाळ येथील कैलास नागरे यांच्या मृत्यूला एक वर्ष पूर्ण झाले असले तरी त्यांच्या कुटुंबाला शासनाकडून अद्याप कोणतीही ठोस मदत मिळालेली नाही. या पार्श्वभूमीवर आमदार सिद्धार्थ खरात यांनी शिवनी आरमाळ येथे जाऊन नागरे कुटुंबाची भेट घेत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि शासनाच्या भूमिकेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.
यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी किरण पाटील आणि उपविभागीय अधिकारी संजय खडसे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत कैलास नागरे यांच्या पत्नी स्वाती नागरे यांना विशेष बाब म्हणून शासकीय सेवेत पोलीस पाटील म्हणून नियुक्त करण्याची मागणी केली.
कैलास नागरे यांनी खडकपूर्णा धरणाच्या डाव्या कालव्यातून परिसरातील १४ गावांना पाणी मिळावे तसेच वाया जाणारे पाणी धरणात सोडण्यात यावे या मागण्यांसाठी आमरण उपोषण केले होते. मात्र त्यांच्या मागण्यांवर तोडगा न निघाल्याने त्यांनी पाण्यासाठी आपले प्राण अर्पण केले. या घटनेला एक वर्ष उलटूनही त्यांच्या कुटुंबाला शासनाकडून अपेक्षित मदत मिळालेली नाही.
नागरे यांच्या घरी भेटीदरम्यान स्वाती नागरे यांनी आपल्या अडचणी आणि समस्या आमदार खरात यांच्यासमोर मांडल्या. त्यानंतर आमदार खरात यांनी प्रशासनाकडे नागरे कुटुंबाला तात्काळ मदत देण्याची मागणी करत त्यांच्या मुलीच्या शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य देण्याचीही मागणी केली.
जर शासनाने नागरे कुटुंबाला शासकीय नोकरी दिली नाही आणि तात्काळ मदत जाहीर केली नाही, तर या प्रकरणी आपण विधानमंडळात लक्षवेधी मांडणार असल्याचा इशाराही आमदार सिद्धार्थ खरात यांनी दिला.
यापूर्वीही कैलास नागरे यांच्या बलिदानानंतर विधानभवनात हा प्रश्न सर्वप्रथम आमदार खरात यांनीच उपस्थित केला होता. त्यांच्या प्रयत्नांतून विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या हस्ते नागरे कुटुंबाला पाच लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली होती.
यावेळी शिवसेनेचे सिंदखेड राजा तालुका अध्यक्ष आत्माराम शेळके, मेहकर तालुका अध्यक्ष निंबाभाऊ पांडव, बद्री बोडके, सिद्धेश्वर आंधळे यांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
📢 आमच्या WhatsApp ग्रुपमध्ये सामील व्हा
दररोजच्या ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि सरकारी अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुपमध्ये सामील व्हा.
Related News













