जालना | जिल्हा प्रतिनिधी : संजीव पाटील
जालना महापालिका निवडणुकीत भाजपा आणि शिवसेना (शिंदे गट) यांची युती तुटल्याने
जालना महानगरपालिका निवडणूक आता अत्यंत चुरशीची आणि बहुकोनी लढत ठरणार आहे.
युती तुटताच राजकीय वातावरण तापले असून माजी आमदार कैलास गोरंट्याल आणि आमदार अर्जुनराव खोतकर
हे पुन्हा एकदा थेट आमनेसामने येणार आहेत.
जालना महानगरपालिका स्थापनेनंतर होणाऱ्या पहिल्याच निवडणुकीत महायुतीसाठी भाजपा, शिवसेना (शिंदे गट),
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (रामदास आठवले गट) यांच्यात
सहा बैठका झाल्या. मात्र जागावाटपावर एकमत न झाल्याने अखेर भाजपा आणि शिंदे शिवसेना गटाने
स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला.
या पार्श्वभूमीवर, विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून लढलेले माजी आमदार कैलास गोरंट्याल यांचा पराभव
करणारे आमदार अर्जुनराव खोतकर यांच्याशी आता महानगरपालिका निवडणुकीत थेट सामना होणार आहे.
विशेष म्हणजे गोरंट्याल यांनी आपल्या पत्नी व मुलाला देखील निवडणूक रिंगणात उतरवले आहे.
दरम्यान, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट)
यांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.
तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) स्वतंत्र निवडणूक लढवणार असल्याची घोषणा माजी आमदार
अरविंद चव्हाण यांनी केली आहे.
आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. अनेक उमेदवारांनी पक्षाचा बी-फॉर्म घेऊन अर्ज दाखल केले,
तर काही बंडखोर व अपक्ष उमेदवारही रिंगणात उतरले आहेत. अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतरच
खरे राजकीय चित्र स्पष्ट होणार आहे.
हे पण वाचा..
जालना महानगरपालिकेच्या एकूण ६५ जागांसाठी ही निवडणूक होत असून, भाजपा व शिंदे शिवसेना यांच्यात
जागावाटपावर तोडगा न निघाल्याने युती तुटल्याची चर्चा आहे.
एकूणच, जालना महापालिका निवडणूक ही अत्यंत चुरशीची व निर्णायक ठरणार आहे.










