रिसोड, वाशिम | 11 जानेवारी 2026
निजामपूर नामांतर श्रीरामपूर या विषयावर वाशिम जिल्ह्यात महत्त्वाची घडामोड घडली असून रिसोड तालुक्यातील मौजे निजामपूर गावाचे नाव बदलून श्रीरामपूर करण्यात यावे, यासाठी अधिकृत प्रस्ताव तहसील कार्यालयात सादर करण्यात आला आहे. सदर प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्याचे सकारात्मक संकेत प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.
रिसोड लगत असलेले मौजे निजामपूर ग्रामपंचायत अनेक वर्षांपासून अस्तित्वात आहे. मोगलाई निजाम काळात या गावाला निजामपूर असे नाव देण्यात आले होते. मात्र स्वातंत्र्यानंतरही हे नाव कायम असल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी असून लोकशाही भारतात त्या कालखंडाची ओळख असलेले नाव बदलावे, अशी मागणी सातत्याने होत आहे.
ग्रामस्थांच्या मागणीनुसार लखनसिंह ठाकूर यांनी निवेदनाद्वारे रिसोड तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी सौ. प्रतीक्षा तेजनकर यांच्याकडे प्रस्ताव सादर केला आहे. ग्रामपंचायत निजामपूरने देखील यासंदर्भात अधिकृत ठराव पारित केला असून निजामपूर ऐवजी श्रीरामपूर हे नाव देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
निजामपूर ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने आवश्यक कागदपत्रांसह प्रस्ताव तहसील कार्यालयात दाखल करण्यात आला आहे. सदर प्रस्ताव तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकारी वाशिम तसेच उपविभागीय अधिकारी यांच्याकडे तात्काळ पाठवण्यात येईल, असे आश्वासन तहसीलदार सौ. प्रतीक्षा तेजनकर यांनी लखनसिंह ठाकूर यांना दिले आहे.
गावाच्या नामांतराबाबत लवकर निर्णय व्हावा, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली असून प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने निजामपूर ते श्रीरामपूर नामांतर प्रक्रिया अंतिम टप्प्यात जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
👉 अशाच वाशिम जिल्ह्यातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी Kattanews.in ला दररोज भेट द्या.










