साखरखेर्डा | समाधान सरकटे
बुलढाणा जिल्ह्यातील साखरखेर्डा गावात गट क्रमांक ८७० मधील १ हेक्टर ६२ आर सरकारी जमीन क्रीडांगणासाठी राखीव ठेवण्याच्या मागणीला अखेर ग्रामसभेत एकमुखी मंजुरी मिळाली. गेल्या काही दिवसांपासून या जमिनीच्या वापराबाबत सुरू असलेल्या वादाला ग्रामसभेच्या निर्णयाने मोठा पूर्णविराम मिळाला असून, निर्णय जाहीर होताच गावातील युवक, खेळाडू आणि नागरिकांनी फटाके फोडून जल्लोष साजरा केला. ग्रामपंचायतीच्या या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.
सदर जमीन शासनाच्या मालकीची असून अनेक वर्षांपासून गावातील युवक या ठिकाणी विविध क्रीडा प्रकारांचा सराव करत आहेत. काही दिवसांपूर्वी या जागेवर अतिक्रमण करण्याच्या उद्देशाने नांगरणी करण्यात आल्याचा आरोप झाल्यानंतर गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेनंतर शेकडो युवकांनी आक्षेप नोंदवत क्रीडांगण कायम ठेवण्याची मागणी केली होती. परिस्थिती लक्षात घेऊन तहसीलदार अजित दिवटे आणि ठाणेदार युवराज रबडे यांनी मध्यस्थी करत संबंधित जागेवर ‘जैसे थे’ आदेश लागू केले आणि जागेचे सपाटीकरण करण्याचे निर्देश दिले होते.
दरम्यान, भाजपचे प्रदेश सदस्य उल्हास देशपांडे यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे पाठपुरावा करून संबंधित जमीन शासनाच्या नावे करण्याची मागणी केली होती. त्यानंतर जमीन शासनाच्या नावे नोंद झाल्याची माहिती समोर आली. मात्र काही व्यक्तींनी संबंधित भूखंड हा साखरखेर्डा एज्युकेशन सोसायटीच्या मालकीचा असल्याचा दावा करत न्यायालयीन प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले. यामुळे या प्रश्नाकडे संपूर्ण गावाचे लक्ष लागले होते.
१६ जुलै रोजी झालेल्या ग्रामसभेत गट क्रमांक ८७० मधील सरकारी जमीन मुलांच्या क्रीडांगणासाठी तसेच ज्येष्ठ नागरिकांना फिरण्यासाठी कायम राखीव ठेवण्याचा ठराव मांडण्यात आला. ग्रामसभेत उपस्थित नागरिक, युवक आणि विविध मान्यवरांनी या प्रस्तावाला एकमुखी पाठिंबा दिला. चर्चेदरम्यान गोपाल राजपूत यांनी न्यायालयीन निकालानंतर जमीन क्रीडांगणासाठी राखीव ठेवावी, मात्र नाव संस्थेचे असावे, असे मत व्यक्त केले. त्यावर अनेक नागरिकांनी हरकत घेत संबंधित जमीन सरकारच्या नावेच कायम ठेवून सार्वजनिक क्रीडांगण म्हणून राखीव ठेवण्याची मागणी केली.
ग्रामसभेला प्रशासकीय सरपंच सौ. ज्योती अमित जाधव, माजी सरपंच पुनम महेंद्र पाटील, सुमनताई जगताप, कमलाकर गवई, दाऊद कुरेशी, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रामभाऊ जाधव, उल्हास देशपांडे, सय्यद रफीक, शेख युनुस, इब्राहिम शहा, चंद्रशेखर शुक्ल, सुनील जगताप, माजी सभापती राजू ठोके, रामदाससिंग राजपूत, ग्रामपंचायत अधिकारी मनोज मोरे, दिलीप खंडारे, संग्रामसिंह राजपूत यांच्यासह शेकडो युवक आणि नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनोज मोरे यांनी केले तर सूत्रसंचालन अरुण देशमुख यांनी केले.
ग्रामसभा संपल्यानंतर साखरखेर्डा बसस्थानक परिसरात युवक आणि खेळाडूंनी फटाके फोडून आनंद साजरा केला. “जमीन नाही कोणा बापाची, ती आहे सरकारची” आणि “क्रीडांगण झालेच पाहिजे” अशा घोषणा देत त्यांनी ग्रामपंचायतीच्या निर्णयाचे स्वागत केले. विशेष म्हणजे या आनंदोत्सवात सर्वपक्षीय कार्यकर्ते, ग्रामस्थ आणि खेळाडू एकत्र सहभागी झाले. गावातील भावी पिढीला दर्जेदार क्रीडा सुविधा उपलब्ध व्हाव्यात आणि सार्वजनिक जागा सुरक्षित राहावी, या भावनेतून ग्रामसभेने घेतलेला हा निर्णय साखरखेर्ड्यासाठी महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
हे पण वाचा..
मोठी घोषणा! महाराष्ट्रातील पात्र शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमाफी; शासनाने काढले नवे परिपत्रक
महाराष्ट्रातील ब्रेकिंग न्यूज, शासकीय योजना, शेती, शिक्षण, रोजगार आणि स्थानिक घडामोडींचे सर्वात जलद अपडेट मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी व्हा.










