देऊळगाव मही | प्रतिनिधी
बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव मही येथे केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी जलजीवन मिशनअंतर्गत सुरू करण्यात आलेली सुमारे ५ कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना तब्बल पाच वर्षांपासून अपूर्ण असल्याने ग्रामस्थांचा संताप अखेर उफाळून आला. रखडलेल्या कामाच्या निषेधार्थ ग्रामपंचायत सदस्यांनी थेट पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधले. आंदोलनानंतर प्रशासनाला तातडीने चर्चेला यावे लागले आणि उर्वरित काम लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन द्यावे लागले.
गावातील जलजीवन मिशनचे काम वारंवार बंद राहत असल्याने नागरिकांमध्ये मोठी नाराजी निर्माण झाली होती. योजनेमुळे प्रत्येक घरापर्यंत शुद्ध पिण्याचे पाणी पोहोचण्याची अपेक्षा असताना अनेक भागांमध्ये अद्यापही पाणीपुरवठा सुरू झालेला नाही. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला.
ग्रामपंचायत सदस्य संदीप विजय राऊत यांनी गावातील पिण्याच्या पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरू केले. या आंदोलनात अनंता नारायण इंगळे, कारभारी देढे, हरी शिंदे, सागर रोताळे यांच्यासह अनेक ग्रामस्थ सहभागी झाले. काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.
ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनात संबंधित ठेकेदारावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. काम वारंवार बंद ठेवणे, निकृष्ट दर्जाचे बांधकाम करणे आणि अनेक ठिकाणी नळजोडण्या करूनही घरापर्यंत पाणी न पोहोचल्याचा आरोप करण्यात आला आहे.
योजनेअंतर्गत सुमारे १४ किलोमीटर पाईपलाईन टाकण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, आतापर्यंत केवळ ९ किलोमीटरपर्यंतच काम पूर्ण झाले असून जवळपास ४० टक्के काम अद्यापही अपूर्ण आहे. पाच वर्षांनंतरही योजना पूर्ण न झाल्यामुळे संबंधित विभागाच्या कार्यपद्धतीवर ग्रामस्थांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
काम अपूर्ण असतानाही बिलांची उचल झाल्याचा आरोपही करण्यात आला आहे. संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच सात दिवसांत काम सुरू करून उर्वरित पाईपलाईन दर्जेदार पद्धतीने पूर्ण करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली होती.
आंदोलनाची माहिती मिळताच ग्रामपंचायत पदाधिकारी, संबंधित अधिकारी आणि कंत्राटदार घटनास्थळी दाखल झाले. जलजीवन मिशनच्या अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. वितरण व्यवस्था आणि उर्वरित पाईपलाईनचे काम तातडीने पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
या आंदोलनामुळे ग्रामीण भागातील रखडलेल्या जलजीवन मिशनच्या कामांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, गावकऱ्यांनी आता प्रत्यक्ष काम सुरू होऊन योजना पूर्ण होण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
वाचकांसाठी महत्त्वाचे
आपल्या परिसरातील ताज्या, विश्वासार्ह आणि सर्वात वेगवान बातम्यांसाठी KattaNews.in ला नियमित भेट द्या. स्थानिक प्रश्न, प्रशासन, गुन्हे, शेती, शिक्षण आणि जनतेशी संबंधित प्रत्येक महत्त्वाची बातमी आम्ही सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत.
Related News










