खामगाव |विशाल गवई
स्थानिक चिखली रोडवरील स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर खासगी बाजार समितीच्या मागील नाल्यामध्ये सुरू असलेल्या विहिरीच्या बांधकामादरम्यान घडलेल्या दुर्दैवी दुर्घटनेत एका मजुराचा मृत्यू झाला. विहिरीचा फर्मा अचानक घसरल्याने भगवान महादेव दांदळे (वय 32) हे विहिरीत कोसळले. त्यांच्या अंगावर माती व बांधकामाचा मलबा पडल्याने ते दबले गेले. तब्बल 13 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर रात्री 11 वाजता त्यांचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले.
मिळालेल्या माहितीनुसार, चिखली रोडवरील स्व. भाऊसाहेब फुंडकर खासगी बाजार समितीच्या मागील परिसरात विहिरीचे बांधकाम सुरू होते. विहिरीत अंदाजे 30 ते 40 फूट पाणी असल्याने काम अत्यंत जोखमीचे बनले होते. 16 जून रोजी सकाळी सुमारे 9 वाजता अटाळी (ता. खामगाव) येथील सहा मजूर नेहमीप्रमाणे कामासाठी दाखल झाले होते.
फर्मा टाकण्याचे आणि माती भरण्याचे काम सुरू असतानाच अचानक फर्मा घसरला. यावेळी भगवान महादेव दांदळे हे थेट विहिरीत पडले. फर्म्यासह मोठ्या प्रमाणावर माती आणि मलबा त्यांच्या अंगावर कोसळल्याने ते त्याखाली दबले गेले. घटनेनंतर उपस्थित मजुरांनी तातडीने गावातील नागरिक, ठेकेदाराचा प्रतिनिधी आणि पोलिसांना माहिती दिली.
दुर्घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मात्र विहिरीतील पाणी उपसण्यासाठी आवश्यक यंत्रसामग्री तातडीने उपलब्ध न झाल्याने बचावकार्याला विलंब झाला. वेळ जात असतानाही अपेक्षित गतीने मदतकार्य सुरू होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली.
अखेर संतप्त ग्रामस्थांनी प्रथम शिवाजीनगर परिसरात आणि त्यानंतर शहर पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलनाचा मार्ग अवलंबला. यावेळी ठाणेदार रामकृष्ण पवार यांच्याशी चर्चा करण्यात आली. चर्चेदरम्यान शिवसेना शिंदे गटाचे अॅड. अमोल अंधारे आणि राजेंद्र बघे यांचीही उपस्थिती होती.
ग्रामस्थांच्या आक्रमक भूमिकेनंतर प्रशासन आणि यंत्रणा तत्काळ सक्रिय झाली. ठाणेदार रामकृष्ण पवार आणि अॅड. अमोल अंधारे यांच्या पुढाकारातून घटनास्थळी 20 एच.पी. क्षमतेची इलेक्ट्रिक मोटार तसेच मोठे जनरेटर उपलब्ध करून देण्यात आले. तहसीलदार सुनील पाटील, मंडळ अधिकारी, तलाठी आणि इतर संबंधित अधिकारी देखील घटनास्थळी दाखल झाले.
दुपारी साडेचार वाजल्यापासून विहिरीतील पाणी उपसण्याचे काम वेगाने सुरू करण्यात आले. अनेक तासांच्या प्रयत्नांनंतर रात्री सुमारे 11 वाजता भगवान दांदळे यांचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी खामगाव येथील सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आला.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून बांधकाम स्थळांवरील सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मजुरांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना आणि नियमांचे काटेकोर पालन होणे गरजेचे असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
नागरिकांकडून चौकशीची मागणी
दुर्घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. बांधकामस्थळी सुरक्षेची योग्य काळजी घेण्यात आली होती का, तसेच बचावकार्याला विलंब का झाला, याचीही चौकशी व्हावी अशी मागणी होत आहे.
वाचकांसाठी महत्त्वाचे
आपल्या परिसरातील ताज्या, विश्वासार्ह आणि सर्वात आधी अपडेट होणाऱ्या बातम्यांसाठी Kattanews.in ला नियमित भेट द्या. स्थानिक घडामोडी, राजकारण, गुन्हे, शेती, शिक्षण आणि सामाजिक विषयांवरील सखोल बातम्या आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत.
Related News










