कट्टा न्यूज | चिखली प्रतिनिधी| १३ मार्च २०२६
बुलढाणा जिल्ह्यातील प्रसिद्ध सैलानी यात्रेसाठी दरवर्षी मोठ्या प्रमाणात भाविक विविध भागांतून प्रवास करतात. यंदाही चिखली बसस्थानकातून हजारो भाविक सैलानी यात्रेला जाण्यासाठी एसटी बसने प्रवास करत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रवासी ये-जा करत असताना चिखली बसस्थानकावर पिण्याच्या पाण्याची सुविधा अपुरी असल्यामुळे यात्रेकरूंना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याची तक्रार समोर आली आहे.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस चिखली तालुक्याच्या वतीने आगार व्यवस्थापकांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात सैलानी यात्रेला जाणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेऊन बसस्थानक परिसरात पिण्याच्या स्वच्छ पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था करण्याची मागणी करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे चिखली तालुका अध्यक्ष संतोष परिहार व तालुका उपाध्यक्ष राजेंद्र सुरडकर यांनी प्रशासनाने मानवीय दृष्टीकोनातून विचार करून यात्रेकरूंना आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी केली आहे. सध्या यात्रेच्या काळात बसस्थानकावर मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने प्रवाशांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे अत्यंत गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, यात्रेच्या पार्श्वभूमीवर चिखली बसस्थानकावर येणाऱ्या भाविकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत, अशी अपेक्षा स्थानिक नागरिक व प्रवाशांकडून व्यक्त केली जात आहे.
Related News
- बुलढाणा जिल्ह्यातील ताज्या बातम्या वाचा
- महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्या
- चिखली तालुक्यातील सर्व अपडेट्स
हे आवश्यक करा..
आपल्या परिसरातील ताज्या व विश्वासार्ह बातम्यांसाठी Kattanews.in ला नियमित भेट द्या. आपल्या भागातील बातमी पाठवण्यासाठी आमच्याशी संपर्क साधा.













