विजय जुंजारे/प्रतिनिधी
वैभव सरनाईक आणि हराळ सर्कल या गाठीलाही आता स्थानिक राजकारणात नवा टर्न मिळत आहे. वैभव सरनाईक यांनी हराळ सर्कल परिसरात चाचपणी सुरू केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगते आहे.
जिल्हा परिषद निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर ही हालचाल महत्त्वाची मानली जाते.काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आणि आमदार अमित झनक यांचे निकटवर्ती समर्थक म्हणून ओळखले जाणारे वैभव सरनाईक हे दिलीपरावजी सरनाईक यांचे पुतणे आहेत.
त्यांनी जानेवारी 2020 मध्ये कवठा सर्कलमधून पहिली निवडणूक लढवली होती. त्या वेळी त्यांना 1200 मतांनी पराभव पत्करावा लागला होता. या सर्कलवर माजी खासदार अनंतराव देशमुख यांचे वर्चस्व अनेक वर्षांपासून टिकून होते.
मात्र, 2021 मध्ये न्यायालयाच्या निर्णयानुसार ओबीसी आरक्षण शून्य झाल्यानंतर जेवढ्या जागा रिक्त झाल्या, त्या सर्वसाधारण प्रवर्गातून लढण्याचे आदेश देण्यात आले.
वैभव सरनाईक यांनी पुन्हा उमेदवारी जाहीर केली आणि “अगर किसी चीज़ को सच्चे दिल से चाहो तो उसे पाने में पूरी कायनात लग जाती है” या वाक्याप्रमाणे त्यांनी जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमांच्या जोरावर 702 मतांनी विजय मिळवला.
या विजयानंतर वैभव सरनाईक यांना जिल्हा परिषद कृषी सभापती म्हणून जबाबदारी देण्यात आली. त्यांनी आपल्या कार्यशैलीच्या जोरावर जिल्ह्यात एक स्वतंत्र ओळख निर्माण केली. विकासकामांवर भर, शेतकरीवर्गाशी जवळीक आणि सामान्य जनतेशी साधलेला संवाद यामुळे त्यांची छबी एक शांत, संयमी आणि विकासाभिमुख नेते म्हणून तयार झाली.
परंतु 2025 च्या जिल्हा परिषद आरक्षणानुसार कवठा सर्कल अनुसूचित जाती (SC) प्रवर्गासाठी राखीव झाल्याने वैभव सरनाईक यांना नवीन राजकीय रणभूमी शोधावी लागली. त्यामुळे आता ते कोणत्या सर्कलमध्ये उतरतील याची चर्चा सर्वत्र सुरू आहे.
अनेक जाणकार आणि स्थानिक सूत्रांच्या माहितीनुसार वैभव सरनाईक यांनी हराळ सर्कल परिसरात चाचपणी सुरू केली आहे. स्थानिक नेत्यांशी भेटीगाठी, जनसंपर्क दौरे आणि कार्यक्रमांच्या माध्यमातून ते आपली उपस्थिती वाढवत आहेत.
स्थानिकांचे म्हणणे काय?हराळ सर्कलमधील नागरिक सांगतात की वैभव सरनाईक हे जनतेशी जोडलेले आणि काम करणारे नेते आहेत. “तो आमचा माणूस आहे, निवडणुकीत उतरलाच तर निश्चित फरक पडेल,” असं मत अनेकांनी व्यक्त केलं. काहींनी मात्र, “नव्या चेहऱ्यांनाही संधी मिळायला हवी,” असं म्हणत संतुलित दृष्टिकोनही व्यक्त केला.
राजकीय विश्लेषणजर वैभव सरनाईक खरोखर हराळ सर्कलवर उतरले तर काँग्रेसला स्थानिक पातळीवर नवा बळकटी मिळू शकतो. दुसरीकडे, इतर पक्षांनीही या समीकरणांचा बारकाईने अभ्यास सुरू केला आहे. 2025 ची निवडणूक बुलढाणा जिल्ह्यातील सत्तासमीकरणे ठरवणारी ठरू शकते.
एकीकडे वैभव सरनाईक यांची सातत्य, कार्यकुशलता आणि समर्थक वर्ग यांचं बलस्थान आहे, तर दुसरीकडे आरक्षणातील बदलामुळे निर्माण झालेली परिस्थिती हे आव्हान आहे. हराळ सर्कलवर उतरायचं अंतिम निर्णय घेतल्यास, जिल्हा राजकारणात नवे समीकरण निश्चितपणे दिसतील.










