चिखली (बुलढाणा) :७ एप्रिल २०२६
उत्रादा गावात जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनेच्या कामावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गावासाठी उभारण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीची चाचणी घेताच गळती सुरू झाल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी पसरली असून 6 एप्रिलपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे.
गावात उभारण्यात आलेल्या सुमारे 50 हजार लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकीत पाणी भरून चाचणी घेतली असता पहिल्याच दिवशी टाकी झिरपू लागल्याचे दिसून आले. यावेळी गावातील काही नागरिक व पत्रकार उपस्थित होते. त्यामुळे कामाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत.
तसेच विहिरीचे बांधकाम कमी खोलीचे असल्याचा आरोप करण्यात येत आहे. पाईपलाईन टाकताना योग्य खोदकाम झाले नसून जोडणीही निकृष्ट पद्धतीने केल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. अनेक ठिकाणी पाईपलाईनचे काम अर्धवट असल्याचेही निदर्शनास आले आहे.
ग्रामस्थांच्या मते, सध्या टाकीत कमी पाणी टाकल्यावरच गळती होत असेल, तर पूर्ण क्षमतेने पाणी भरल्यास टाकी कोसळण्याचा धोका नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
या पार्श्वभूमीवर कामाची सखोल चौकशी करून वापरण्यात आलेल्या साहित्याची तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच दोषी ठेकेदारावर कारवाई करून त्याला काळ्या यादीत टाकावे आणि बिल थांबवावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
ग्रामस्थांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, जोपर्यंत या कामाची योग्य चौकशी होत नाही आणि दोषींवर कारवाई होत नाही, तोपर्यंत उपोषण सुरूच राहील. यामुळे प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
👉 आपल्या भागातील अशाच महत्त्वाच्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी Kattanews.in ला नियमित भेट द्या.
संबंधित बातम्या











