रिसोड | प्रतिनिधी: विजय जुंजारे
रिसोड–मोप रस्त्यावर घडलेली दरोड्याची घटना प्रत्यक्षात नवरी पलायन संशयातून घडलेले अपहरण प्रकरण असल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे. रिसोड–मोप रस्त्यावर दरोडा आणि मारहाणीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र तपासात हा रिसोड अपहरण प्रकार नवरी पलायनाशी थेट संबंधित असल्याचे स्पष्ट झाले असून, वाशिम पोलिसांच्या जलद कारवाईमुळे काही तासांत संपूर्ण कट उघडकीस आला.
तपासादरम्यान आरोपींनी मोहजा (ता. रिसोड) येथील घरात घुसून नवरी मुलगी न मिळाल्याने तोडफोड केल्याचे उघड झाले. तसेच वरपक्षातील दीपक खानझोडे यांना फोन करून, “मुलगी परत दे, अन्यथा अपहरण केलेल्या सीताराम खानझोडे यांना जिवंत ठेवणार नाही,” अशी धमकी देण्यात आली.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी अहिल्यानगर, संभाजीनगर व जालना जिल्ह्यांत संयुक्त शोधमोहीम राबवली. अखेर अपहरण करण्यात आलेले सीताराम खानझोडे यांना अहिल्यानगर येथून सुखरूप मुक्त करण्यात आले.
या प्रकरणात राहुल दिलीप म्हस्के, सतिष विनायक जाधव यांना अहिल्यानगर येथून अटक करण्यात आली असून आकाश छगन गायकवाड याला जालना येथून ताब्यात घेण्यात आले आहे. नवरी मुलगी व विवाहाचा मध्यस्थ शांताराम खराटे यांनाही पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार १० डिसेंबर २०२५ रोजी दीपक खानझोडे यांचा विवाह राधा तुपे हिच्याशी झाला होता. लग्नासाठी दोन लाख रुपयांचा व्यवहार झाला असून नवरी पळून जाण्याच्या तयारीत असल्यामुळे हा संपूर्ण थरार घडल्याचे स्पष्ट झाले.
या प्रकरणी रिसोड पोलीस स्टेशन येथे भारतीय न्याय संहितेतील दरोडा, अपहरण, मारहाण, धमकी व तोडफोडीच्या गंभीर कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुढील तपास पोउपनि. शिवचरण डोंगरे करत आहेत.
👉 वाचकांसाठी आवाहन
अशाच थरारक, सत्य आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी KattaNews.in ला नियमित भेट द्या आणि आमचा WhatsApp / Google Discover फॉलो करा.
📰 हे पण वाचा..










