बुलढाणा | विशाल गवई
तहसीलदार आणि उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी रस्ता खुला करण्याचे आदेश दिल्यानंतरही शेतात जाण्यास अडथळा निर्माण होत असल्याचा आरोप करीत माळवंडी येथील शेतकरी गणेश उखाजी आमले यांनी थेट मंत्रालय गाठले. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन रस्ता खुला करून न्याय द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. याप्रकरणी अमरावती विभागाच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांकडेही निवेदन सादर करण्यात आले आहे.
माळवंडी येथील गट क्रमांक १३१ मध्ये गणेश आमले यांची शेती आहे. शेजारील सोनुने आणि कड कुटुंबीयांकडून शेतरस्ता अडविला जात असल्याने तो खुला करून देण्यासाठी त्यांनी तहसीलदारांकडे प्रकरण दाखल केले होते. तहसीलदारांनी रस्ता खुला करण्याबाबत आदेश पारित केल्यानंतरही अडथळे निर्माण होत असल्याचे आमले यांनी निवेदनात म्हटले आहे.
तहसीलदारांच्या आदेशानंतर शेतात जात असताना आपल्याला अडवून जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या, तसेच शिवीगाळ करण्यात आली, असा आरोप आमले यांनी केला आहे. संगीता अनिल सोनुने, कडुबा लक्ष्मण कड, अनिल सोनुने, वैभव अनिल सोनुने, समाधान कडुबा कड, कैलास कडुबा कड, आनंद कड, संकेत कड आणि इतर तीन महिलांकडून वेळोवेळी अडवणूक व धमक्या दिल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
दरम्यान, गैरअर्जदारांनी तहसीलदारांच्या आदेशाला आव्हान देत उपविभागीय अधिकाऱ्यांकडे अपील केले होते. मात्र, सुनावणीनंतर उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनीही गणेश आमले यांच्या बाजूने निर्णय दिल्याचे निवेदनात नमूद आहे. तसेच तहसील प्रशासन आणि रायपूर पोलिसांनी रस्ता खुला करून देण्याबाबत पत्र दिले होते. त्यानंतर पोलीस बंदोबस्तात रस्ता खुला करण्यात आला.
मात्र, रस्ता खुला केल्यानंतर दोन दिवस उलटत नाही तोच पुन्हा शेतात जाण्यास अडथळा निर्माण करण्यात आला, असा आरोप आमले यांनी केला आहे. ऐन पेरणीच्या हंगामात शेतात जाता येत नसल्याने त्यांनी जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदन देऊन कारवाईची मागणी केली. मात्र, अद्याप न्याय मिळाला नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
महसूलमंत्र्यांकडून दिलासा, पण… अखेर गणेश आमले यांनी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे धाव घेतली. यावेळी त्यांनी सविस्तर निवेदन सादर करून रस्ता खुला करून देण्याची मागणी केली. बावनकुळे यांनी निवेदनावर अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने नोंद करीत न्यायोचित कार्यवाही करण्याचे आदेश दिल्याचे आमले यांनी सांगितले. मात्र, या आदेशानंतर सतरा दिवस उलटूनही कार्यवाही झाली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
पोलिसांवरही आरोप अमरावती विभागाच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे सादर केलेल्या निवेदनात आमले यांनी रायपूर पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ठाणेदार सोळंके आणि माळवंडी बीटचे अंमलदार घाटे यांच्याकडून सहकार्य होत नसल्याचे त्यांनी नमूद केले आहे. तसेच गैरअर्जदारांकडून अर्थपूर्ण हितसंबंध जोपासले जात असल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी आमले यांनी केली आहे.
शेतरस्ता खुला करण्याचे आदेश आणि त्यानंतरही सुरू असलेली अडवणूक यामुळे हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. प्रशासनाने तातडीने दखल घेऊन शेतकऱ्याला न्याय द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
📲 KattaNews WhatsApp ग्रुपमध्ये सामील व्हा!
आपल्या परिसरातील ताज्या बातम्या, शेतकरी योजना आणि महत्त्वाच्या घडामोडी थेट WhatsApp वर मिळवण्यासाठी आमच्या ग्रुपमध्ये सामील व्हा.
📰 संबंधित बातम्या
तुमच्या गावातील बातमी, समस्या किंवा महत्त्वाची माहिती आमच्यापर्यंत पोहोचवा. योग्य पडताळणीनंतर ती बातमीच्या स्वरूपात प्रसिद्ध केली जाऊ शकते.










